अमरावती : जिल्ह्यात १८ ते २० मार्च या कालावधीत झालेला अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे १४,९९४ हेक्टर ७० आर क्षेत्रामधील शेती व फळपिकांचे ३३ टक्क्यांवर नुकसान झाले. एका व्यक्तीसह चार गुरे दगावली. २० घरांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल आहे. यामध्ये सर्वाधिक ११,६८८ हेक्टरवरील संत्र्याच्या मृग बहराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याशिवाय २,६२७ हेक्टरवरील उभा गहू झोपला.
जिल्ह्यातील १० तालुक्यांत १८ ते २० मार्च दरम्यान वादळासह अवकाळी पाऊस व गारपिटीने गहू, हरभरा, भाजीपाला व फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अमरावती तालुक्यातील ११ गावांत ६९ हेक्टरवरील गहू, १३ हेक्टरवरील कांदा, चांदूर रेल्वे तालुक्यात २८ गावांत ३३३ हेक्टरवरील गहू, ६४ हेक्टरवरील कांदा, , धामणगाव तालुक्यातील १३ गावांत ३३६ हेक्टरवरील गहू, २ हेक्टरवरील आंबा, धारणी तालुक्यात ६ गावांत ३५ हेक्टरवरील गहू, २७ हेक्टरवरील हरभरा, चिखलदरा तालुक्यात २ गावांत ८ हेक्टरवरील गहू, १ हेक्टरवरील हरभरा, नांदगाव खंडेश्वर तालुक्यात ४ गावांत ५५ हेक्टरवरील गहू, मोर्शी तालुक्यात ४३ गावांमधील ५३० हेक्टरवरील गहू, १०४ हेक्टरवरील हरभरा, ३ हेक्टरवरील कांदा, २२ हेक्टरवरील भाजीपाला व २२ हेक्टरवरील इतर पिके, तिवसा तालुक्यात २४ गावांत ६५ हेक्टरवरील गहू, १ हेक्टरवरील कांदा, अचलपूर तालुक्यात ४३ गावांमध्ये ५८८ हेक्टरवरील गहू, ३ हेक्टरवरील हरभरा, ९४ हेक्टरवरील कांदा, ५५ हेक्टरवरील केळी तसेच चांदूर बाजार तालुक्यात ४९ गावांत ६०७ हेक्टरवरील गहू, २ हेक्टरवरील हरभरा व ७ हेक्टरवरील केळीचे ३३ टक्क्यांवर नुकसान झालेले आहे.
बॉक्स
संत्रा मृग बहराचे नुकसान
चांदूरबाजार तालुक्यात संत्र्याच्या मृग बहराची सर्वाधिक ५,१२७ हेक्टरमध्ये फळगळ झाली. अचलपूर तालुक्यात २९६९ हेक्टर, मोर्शी ३१८०, धामणगाव रेल्वे ३७, चांदूर रेल्वे ३४७ व अमरावती तालुक्यातील २८ हेक्टरमध्ये ३३ टक्क्यांवर संत्राबागांचे नुकसान झाले.
बॉक्स
१० तालुक्यात पिकांचे मोठे नुकसान
दहा तालुक्यांतील २२३ गावांमध्ये १४,९९४ हेक्टरवरील रबी पिकांचे ३३ टक्क्यांवर नुकसान झाले. यामध्ये सर्वाधिक ६,००० हेक्टर चांदूर बाजार तालुक्यात आहे. मोर्शी ३८६१, अचलपूर ३७०९, चांदूर रेल्वे ७४५, धामणगाव रेल्वे ३७५, अमरावती ११०, तिवसा ६६.१०, धारणी ६३.२०, नांदगाव खंडेश्वर ५५, तर चिखलदरा तालुक्यात ९ हेक्टरमध्ये नुकसान नोंदविले गेले.