अकोला : मकर संक्रांतीचा सण जवळ आला आहे. या सणाला तीळ व गुळाच्या लाडूचे व इतर पदार्थांचे अधिक महत्त्व असते. तथापि, बाजारपेठेत तिळाची आवकच कमी असल्याने संक्रांतीपूर्वीच भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे यंदा संक्रांतीला तिळाचा गोडवा कमी होणार असल्याचे संकेत आहेत.विदर्भात तेलबिया लागवडीच्या क्षेत्रात सातत्याने घट झाली आहे. कापूस आणि ज्वारीच्या पिकास आंतरपीक म्हणून तिळाचे उत्पादन घेणारा शेतकरी आता सोयाबीनच्या पेर्याकडे वळला आहे. तेलबीयांना सातत्याने मिळत असलेल्या कमी भावामुळे यंदा विदर्भातील तीळ लागवडीचे क्षेत्र केवळ ९४00 हेक्टरवर येऊन थांबले. हेक्टरी उत्पादनही ३.७७ क्विंटलपर्यंत खाली घसरल्याने बाजारपेठेत तिळाची आवक यंदा कमी आहे. परिणामी मकर संक्रांतीला अद्याप तीन आठवडे अवकाश असताना कृषिउत्पन्न बाजार समितीत तीळ प्रतिक्विंटल १२३00 रुपये आणि किरकोळ दर १२0 ते १५0 रुपये प्रतिकिलोपर्यंत येऊन पोहोचला आहे. मकरसंक्रांतीपर्यंत या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याचे मत धान्य व्यापारी दिनेश राठी यांनी व्यक्त केले. संपूर्ण राज्यातच तिळाचे उत्पादन कमी असल्याने अकोल्यातील व्यापारी आंध्र आणि कर्नाटकमधून तीळ मागवित असल्याचेदेखील त्यांनी सांगितले.काळा आणि पांढरा अशा दोन सहज ओळखल्या जाणार्या तिळाच्या जाती असून, खरीप आणि रब्बी अशी दोन पिके तिळाची घेतली जातात. ऑलिव्ह ऑइलप्रमाणे गुणधर्म असल्याने तीळाचा उपयोग आरोग्य संवर्धनासाठीदेखील केला जातो. मुख्यत्वेकरून पांढर्या तिळाचा उपयोग मिठाई निर्मितीसाठी केला जातो, तर साबण, अत्तर व इतर गोष्टींसाठी काळय़ा तिळाचे तेल वापरले जाते. यंदा अत्यल्प झालेल्या पावसामुळे बहुतांश विदर्भातील शेतकर्यांनी तिळाची लागावडच केली नाही. अनेक कास्तकारांना फटका बसला आहे. परिणास्वरूप डिसेंबर, जानेवारीमध्ये बाजार समित्यांमध्ये दाखल होणार्या तिळाची आवक घटली असल्याची माहिती ज्येष्ठ तेलबिया संशोधक डॉ. एस. एन. देशमुख यांनी दिली.
यंदा तिळाचा गोडवा कमी होणार!
By admin | Updated: December 26, 2014 01:23 IST