किशोर खैरे /नांदुरा (जि. बुलडाणा): राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाचे लवकरच रुंदीकरण होत आहे. या रुंदीकरणामध्ये शेतजमीनी गेलेल्या शेतकर्यांना कोर्ट कचेर्या केल्यानंतर मोबदलाही मिळाला आहे. पण आता शासनाकडून वाढीव मोबदला मिळावा, यासाठी नांदुरा शहरातील काही व्यापार्यांनी कथितस्तरावर शेती घेतली असून रस्ता रुंदीकरण कामात जाणार्या शेतातील जागेतच फळबागा लावल्या आहेत. मोबदला भेटलेल्या जागेवर या फळबाग लावल्या जात आहे. त्यासाठी रेडीमेड मोठी फळांची झाडे आणून राष्ट्रीय महामार्गासाठी अधिग्रहीत केलेल्या शेतीवर ती लावण्यात आली आहेत. विशेष म्हणजे त्यांना टँकरद्वारेही पाणी देणे सुरू असून त्या जोपासण्याचा प्रयत्न होत आहे. रस्त्यासाठी जेवढी जागा अधिग्रहीत झाली आहे बरोबर तेवढय़ाच जागेवर फळबाग लावण्यात आली आहे. सोबतच या शेतीचा स्थानिक पटवार्यामार्फत कथीतस्तरावर कागदोपत्री सर्व्हे करून तेथे फळबाग असल्याची नोंदही करून घेतली आहे. दरम्यान, उपविभागीय अधिकारी कार्यालयातील काही अधिकार्यांना हाताशी धरून या फळ झाडांची प्रत्येकी दहा ते ४0 हजार रुपये नुकसान भरपाई मिळत असल्याने पुन्हा मोबदला मिळण्याची मागणी केली जात असल्याची नांदुरा शहरात चर्चा आहे. जीगाव प्रकल्पातंर्गतही काही शेत जमीनीवर असा प्रकार सुरू असल्याचे समजते.
वाढीव मोबदल्यासाठी अनोखी शक्कल
By admin | Updated: November 23, 2015 01:15 IST