आकोट (जि. अकोला): दुष्काळी परिस्थितीचा सामना करणार्या शेतकर्याच्या घरात चोरट्यांनी धुमाकूळ घालून शस्त्राच्या धाकावर ९६ हजार रुपये लुटल्याची घटना आकोट तालुक्यातील कालवाडी येथे घडली. चोरट्यांनी घातलेल्या हैदोसामुळे शेतकरी सुभाष बढे बेशुद्ध पडले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटना घडून १३ दिवस उलटल्यानंतरही पोलिसांनी अद्यापही गुन्हा दाखल केलेला नाही. कालवाडी येथील संत तुकाराम महाराज मंदिराजवळ असलेल्या सुभाषराव बढे यांच्या घरात चोरट्यांनी १२ ऑक्टोबर रोजी पहाटे ३.३0 वाजताच्या सुमारास मागील दाराने प्रवेश केला. अचानक सुभाष बढे यांच्या पत्नी सिंधुबाई बढे यांना जाग आली. घरात कोणी तरी घुसल्याचे त्यांच्या लक्षात आले. चोरट्यांना पाहताच त्यांनी आरडाओरड केली. त्यामुळे चोरट्यांनी त्यांना धारदार शस्त्राचा धाक दाखविला. परिणामी त्यांनी जीव वाचवित दुसर्या खोलीत धाव घेतली. या खोलीत मुले श्याम, राम व मनीष झोपले होते. त्यांनी मुलांना घटनेची माहिती दिली. मात्र, चोरट्यांनी या खोलीचे दार बाहेरून लावून घेतले. त्यानंतर काही वेळातच चोरट्यांनी कपाटात असलेली पेटी फोडून ९६ हजार रोख व शेतीसह इतर कागदपत्रे लंपास करून पळ काढला.
शेतक-याच्या घरात चोरट्यांचा धुमाकूळ
By admin | Updated: October 26, 2015 01:58 IST