उरळ (अकोला): हसनापूर येथील ७0 वर्षीय शेतकर्याने नापिकीस व कर्जबाजारीपणास कंटाळून सोमवारी शेतात वीष प्राशन करून आत्महत्या केली. हसनापूर येथील शेतकरी वासुदेव अर्जुन राऊत यांनी सोमवारी सकाळी ६.३0 वाजता हसनापूर शिवारातील शेतात विष प्राशन करून आत्महत्या केली. त्यांच्या शेतात यावर्षी कपाशीचे पीक पेरले होते. पेरणीसाठी अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उरळ शाखेचे ४0 हजार रुपयांचे पीक कर्ज त्यांनी घेतले होते. कपाशीला पाणी देण्यासाठी विंधन विहीर खोदण्याकरिताही बँकेचे कर्ज घेतले. परंतु, खोदलेल्या विंधन विहिरीस पाणी लागले नाही. परिणामी, कपाशीचे पीक सुकले. या नापिकीने व कर्जबाजारीपणाने हताश होऊन वासुदेव राऊत यांनी विष प्राशन केले. या घटनेबाबत मृतकाचे नातेवाईक संतोष पांडुरंग राऊत यांनी उरळ पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली. या प्रकरणी उरळ पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. उरळ पोलीस स्टेशनचे जमादार दादाराव लिखार व पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण मोरे हे मृतदेह घेऊन उत्तरीय तपासणीसाठी अकोल्यास रवाना झाले आहेत. या घटनेचा तपास ठाणेदार पी.के. काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी करीत आहेत.
कर्जबाजारी शेतक-याची आत्महत्या
By admin | Updated: December 15, 2015 01:56 IST