विवेक चांदूरकर / वाशिम : नाथजोगी समाजात यापूर्वीही जातपंचायत भरविण्यात आली असून, अनेकांना दंडही ठोठाविण्यात आला आहे. यामध्ये आतापर्यंत चार जणांचा बळी गेला असल्याचे भयानक वास्तव गणेशपूर येथील नागरिकांनी शुक्रवारी मांडले. यामुळे या गावातील नागरिक दहशतीत आहेत. रिसोड तालुक्यात गणेशपूर येथील सुभाष सावंत यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांची पत्नी व वडिलांनी हिंमत दाखवित रिसोड पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर जिल्हाधिकार्यांकडेही या प्रकरणाकडे लक्ष देण्याची मागणी केली. त्यामुळे सदर प्रकरण उजेडात आले असून, सर्वत्र गाजत आहे. या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी गणेशपूर येथे लोकमत चमू गेली असता सावंत यांच्या घराजवळ राहणार्या लोकांनी त्यांच्या व्यथा मांडल्या. अल्प मिळकतीतून संसाराचा गाडा ओढणार्या या लोकांना आणखी जात पंचायतींच्या कठोर निर्णयाचाही सामना करावा लागत आहे. अशा प्रकारच्या जात पंचायती यापूर्वीही अनेकदा भरविण्यात आल्या आहेत. तसेच सुभाष सावंत यांचे वडील आप्पाराणू सावंत यांनी यापूर्वीही त्यांना दंड ठोठावण्यात आल्याचे सांगितले. समाजातील विविध लोकांना नेहमीच दंड ठोठावण्यात येतो, असेही त्यांनी सांगितले. या जातपंचायतीमुळे होत असलेल्या अन्यायाचे या परिसरातील नागरिकांनी कथन केले. समाजातील जातपंचायतीमुळे आतापर्यंंंंत चार जणांचा बळी गेल्याचा आरोप यांनी केला आहे. कोणतीही मान्यता नसताना जातपंचायत भरविलीच कशी जाते व त्याचा आदेश मान्यही कसा केला जातो, असा आरोपही या लोकांनी केला.
जात पंचायतीचे आतापर्यंत चार बळी
By admin | Updated: November 22, 2015 02:03 IST