अकोला: अत्यल्प पाऊस आणि त्यामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत जिल्ह्यात चाराटंचाईचा प्रश्न गंभीर होणार आहे. या पृष्ठभूमीवर उपलब्ध चारा जिल्ह्याबाहेर जाऊ नये, यासाठी चारा वाहतुकीस बंदी करण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागामार्फत जिल्हाधिकार्यांकडे मंगळवारी सादर करण्यात आला.यावर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने खरीप हंगामातील पिके शेतकर्यांच्या हातून गेली. ओलावा खोल गेल्याने रब्बी पिकांचेही उत्पादन बुडाल्यात जमा आहे. नापिकीच्या परिस्थितीत जिल्हय़ात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. दुष्काळी परिस्थितीत जिल्ह्यात पाणीटंचाई सोबतच जनावरांसाठी चाराटंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. यावर्षी चारा उत्पादनात झालेली घट लक्षात घेता, उन्हाळ्यात चार्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. चाराटंचाईवर मात करण्यासाठी येत्या एप्रिल-मे महिन्यात जिल्ह्यातील जनावरांसाठी बाहेरून चारा उपलब्ध करावा लागेल, तसेच चारा डेपोदेखील उघडावे लागणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यात सध्या उपलब्ध असलेला चारा जिल्ह्याबाहेर जाणार नाही, टंचाईच्या परिस्थितीत व्यापार्यांकडून जिल्ह्यातील चार्याची वाहतूक जिल्ह्याबाहेर होऊ नये, यासाठी जिल्ह्यातील चारा वाहतुकीस बंदी करण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत जिल्हाधिकार्यांकडे सादर करण्यात आला आहे.
अकोला जिल्ह्याबाहेर चारा वाहतुकीस बंदीचा प्रस्ताव
By admin | Updated: December 11, 2014 01:05 IST