अकोटः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत १६ लाखांचा अपहार प्रकरणातील आरोपी सचिव राजकुमार माळवेसह दोघेजण अद्याप फरार असून, माळवे यांना सचिवपदावरून तत्काळ निलंबित करण्यात यावे, तसेच विभागीय चौकशीसाठी आरोपपत्र मुख्य प्रशासकांनी बजावावे, अशा मागणीचे पत्र माजी सभापती गजानन पुंडकर यांनी दिले आहे. आरोपी असलेल्या सचिवांना चौकशीच्या दृष्टीने पदावरून अद्याप हटविण्यात आले नसल्याने राज्य प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी आरोपीची पाठराखण करीत असल्याची शंका शेतकरी व्यक्त करीत आहेत.
अकोट येथील बाजार समितीचे मुख्य प्रशासक तथा उपनिबंधक पालेकर यांना दिलेल्या पत्रात सचिव राजकुमार माळवे व लेखापाल बोंद्रे यांच्यावर १६ लाख रुपयांची अफरातफर केल्याबाबतच्या लेखापरीक्षण अहवालानुसार पोलीस स्टेशन, अकोट येथे फौजदारी गुन्हा दाखल झाला आहे. दोन्ही आरोपी फरार असून, पोलीस शोध घेत आहेत. लेखापाल बोंद्रे यांना तत्कालीन संचालक मंडळाने निलंबित केले. मात्र, सचिव माळवे यांच्यावर समितीने कारवाई न करता सचिवाला अभय दिल्याचा आरोप होत आहे. पुढील आदेश मिळेपर्यंत सचिव माळवे यांना तत्काळ निलंबित करून नमूद तक्रारीमधील प्रशासकीय व आर्थिक अशा गंभीर १८ प्रकरणांच्या विभागीय चौकशीचे आरोपपत्र प्रशासकांनी बजावावे, असे माजी सभापती गजानन पुंडकर यांनी तक्रारीत नमूद केले आहे. विशेष म्हणजे या पत्रासोबतच सन २०१४ - २०पर्यंतचे लेखा परीक्षण अहवाल व पोलीस एफआयआर जोडले आहेत. विभागीय चौकशी झाल्यास बाजार समितीमधील गंभीर प्रकार उजेडात येण्याची शक्यता आहे. दरम्यान, हा गैरप्रकार उजेडात आल्यास अनेकांचे पितळ उघडे पडण्याच्या भीतीपोटी अनेक राजकीय पक्ष व संघटनांनी सावधगिरीचा पवित्रा घेतल्याचे दिसून येत आहे.