तालुकास्तरीय गुणनियंत्रक भरारी पथकाने गेल्या काही दिवसांपासून बार्शी टाकळी तालुक्यातील कृषी सेवा केंद्रांवर धाडसत्र सुरू केले आहे. बी-बियाणांची व खतांची माहिती न ठेवणे, स्टॉक बुक व्यवस्थित न ठेवणे, दुकानात बोर्ड नसणे, त्यावर अद्यावत माहिती न ठेवणे, वजन काटा प्रमाणित न ठेवणे आदी कारणांमुळे बार्शी टाकळी तालुक्यातील चार कृषी सेवा केंद्रांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या आहेत. पैकी दोन कृषी सेवा केंद्र पिंजर येथील असल्याची माहिती भरारी पथकाने दिली आहे. या चार कृषी केंद्रावर कारवाईसाठीचा अहवाल परवाना अधिकारी अकोला यांच्याकडे पाठविला आहे.
येथील कृषी केंद्रांची तपासणी
भरारी पथकाने बार्शी टाकळी, महान, राजंदा, पिंजर या ठिकाणच्या कृषी सेवा केंद्रांची तपासणी, झाडाझडती घेतली आहे. बार्शी टाकळी तालुक्यातील चार कृषी सेवा केंद्रचालकांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. गुणनियंत्रक, तालुकास्तरीय भरारी पथकामध्ये पथक प्रमुख तालुका कृषी अधिकारी दीपक तायडे, पथकाचे सचिव विलास वाशीमकर, पंचायत समिती कृषी अधिकारी संजय चांदूरकर आदींचा समावेश होता.