आकोट : शेतातील आंब्याची झाडे जाळून नुकसान केल्याबाबतच्या फिर्यादीची पोलिसांनी दखल न घेतल्याने फिर्यादीने न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायाधीशांच्या आदेशान्वये आकोट पोलिसांनी झाडे जाळणार्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.याबाबत सविस्तर असे की, ज्ञानदेव बाळकृष्ण जवंजाळ (वय ६५) यांचे तालुक्यातील रंभापूर येथे शेत आहे. या शेतात आंब्याची १० झाडे आहेत. आंब्याची रखवाली करणारास प्रमोद रामकृष्ण काळमेघ रा. उज्ज्वलनगर आकोट याने आंबे मागितले. रखवालदाराने नकार दिला. याचा राग येऊन प्रमोदने १० आंब्याची झाडे व १ जांभूळचे झाड यांना आग लावली. त्यामुळे ज्ञानदेव जवंजाळ यांचे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले. या प्रकाराची आकोट पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदविली. तथापि पोलिसांनी अदखलपात्र म्हणून या गुन्ाची नोंद घेतली. त्यावर फिर्यादीने न्यायालयात धाव घेतली. त्यावर सुनावणी होऊन आकोट प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी डी. सी. मालवीय यांनी या प्रकरणी गुन्हे दाखल करण्याचा आदेश दिला. त्यानुसार ज्ञानदेव जवंजाळ यांचेतर्फे पोकाँ. नितीन वडदकर यांनी तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून प्रमोद काळमेघ यांचेविरुद्ध भादंवि ४३५, ५०४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आंब्याची झाडे जळाल्याने दीड लाखांचे नुकसान
By admin | Updated: June 2, 2014 01:36 IST