कारंजा लाड (जि. वाशिम) : नादुरूस्त विज रोहित्रामुळे शेतातील पिके पाण्याअभावी सुकत असताना, वारंवार मागणी करूनही नवे रोहित्र बसविले जात नसल्याने तालुक्यातील एका शेतकर्याने विज वितरण कंपनीच्या कार्यालयातच विष प्राशन करण्याचा प्रयत्न केल्याची घटना गुरूवारी कारंजा येथे घडली. कारंजा तालुक्यातील खेर्डा (जिरापूरे) येथील शेतकर्यांनी उच्च क्षमतेचे नविन रोहीत्र बसविण्यासाठी येथील वीज कंपनीकडे २0१३ मध्ये अर्ज केला होता. या ठिकाणी असलेले पूर्वीचे रोहित्र कमी क्षमतेचे असून, याच रोहित्रावरून अनेक शेतकरी वीज घेत असल्याने अतिरिक्त दाब येऊन या रोहित्रात वारंवार बिघाड येत होता. त्यामुळे विजपुरवठय़ाअभावी पिकांना पाणी देणे शेतकर्यांना शक्य होत नव्हते. हे रोहित्र बदलून नवे आणि अधिक क्षमतेचे रोहित्र बसविण्याची मागणी शेतकर्यांनी केली होती; परंतु शेतकर्यांच्या या मागणीची दखल विज वितरणच्या अधिकार्यांकडून घेण्यात येत नव्हती. दरम्यान, तीन दिवसांपूर्वी येथील जुन्या रोहित्रात पुन्हा बिघाड झाल्यामुळे शेतकर्यांना पिकांना पाणी देणे अशक्य झाले. परिणामी पिके सुकू लागली. या स्थितीबाबत शेतकर्यांनी वीज कंपनीच्या संबंधित अभियंत्याना अवगत केले. त्यानंतरही शेतकर्यांची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे खेर्डा (जिरापुरे) येथील संतप्त शेतकर्यांनी गुरूवारी येथील विज कंपनीच्या कार्यालयावर धडक दिली. यावेळी शेतकर्यांची विज कंपनीच्या अधिकार्यांशी चर्चा सुरू असतानाच, संजय गागरे नामक शेतकर्याने विषारी औषध प्राशन करण्याचा प्रयत्न केला. उपस्थित शेतकर्यांनी लगेच त्यांच्या हातातील विषारी औषधाची बाटली हिसकावून घेतली. त्यामुळे अनर्थ टळला.
वीज वितरण कार्यालयातच शेतक-याचा आत्महत्येचा प्रयत्न
By admin | Updated: September 4, 2015 00:25 IST