अकोला: निसर्गाच्या लहरीपणामुळे जिल्ह्यातील शेतकरी गत तीन वर्षांंपासून जेरीस आला आहे. यावर्षी अल्प पाऊस झाल्यामुळे खरीप हंगामातील मूग, उडीद ही पिके हातची गेली, तर सोयाबीन, कपाशी व तुरीचे उत्पादन घटले आहे. जमिनीत ओलावा नसल्यामुळे रब्बी हंगामाचीही शक्यता धूसर आहे. शासनाने जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा, या मागणीसाठी शेतकरी जागर मंच शुक्रवार, ६ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या देणार आहेत यावर्षी पावसाने दगा दिल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. उधार-उसनवारी व कर्ज घेऊन पेरणी केली; परंतु अपेक्षेनुसार उत्पादन झाले नाही. मूग, उडिदाची पिकं गेली. सोयाबीनचा उताराही एकरी तीन ते चार क्विंटल एवढा येत आहे. यातून पेरणीसाठी झालेला खर्चही वसूल झालेला नाही. परिस्थिती एवढी भीषण असतानाही शासनाने जिल्ह्याची पैसेवारी ५0 पैशांपेक्षा अधिक जाहीर केली. अस्मानी व सुलतानी संकटाने शेतकरी पिचून गेले आहेत. अनेक शेतकरी आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलत असताना शासनाचे त्याकडे फारसे लक्ष नाही. दिवाळीसारखा सण तोंडावर आला असताना पैसा नसल्यामुळे शेतकर्यांनी बाजारपेठेकडे पाहिलेदेखील नाही. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसलेल्या शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने धोरणात्मक निर्णय घेऊन संपूर्ण कर्जमाफी द्यावी, तसेच जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, अशा मागणीचे निवेदन जागर मंचने जिल्हाधिकार्यांना २७ ऑक्टोबर रोजी दिले होते. याच मागणीच्या अनुषंगाने शुक्रवार, ६ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या देणार आहेत. या आंदोलनात मनोज तायडे, गजानन फुंडकर, दिनकरराव वाघ, प्रशांत नागे, ज्ञानेश्वर गावंडे, गोपाळराव काठोळे, बाळासाहेब वसू, शेख गणी, शरद देशमुख यांच्यासह कौलखेड, विराहित, म्हैसांग, रामगाव, अन्वी मिर्झापूर, पळसो, सुकळी, सांगळूद, डोंगरगाव मासा, बोरगाव मंजू, आपातापा येथील शेतकरी उपस्थित राहणार आहेत.
अकोला जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्याच्या मागणीसाठी शेतकरी सरसावले
By admin | Updated: November 2, 2015 02:55 IST