राज्यात एप्रिल-मे २०२१ मध्ये उद्भवलेल्या कोरोनाच्या उद्रेकामुळे शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल विक्रीस अडथळा निर्माण झाला होता. या परिस्थितीत ३० जूनपर्यंत कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनामार्फत डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभ मिळत होता. यामध्ये जिल्हा बँकेमार्फत कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याज दर तर व्यापारी किंवा राष्ट्रीयीकृत बँकेकडून १ लाखाच्यावर कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून २ ते ३ टक्के व्याज दरात सवलत मिळत होती. या योजनेचा फायदा मिळण्यासाठी ३० जूनपर्यंत घेतलेल्या कर्जाची परतफेड करणे आवश्यक होती; मात्र कोरोनाची परिस्थितीमुळे उद्भवल्याने या योजनेला मुदत वाढ देणे ही बाब शासनाच्या विचाराधीन होती. शासनाने सदर पीक कर्जाला ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे. यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. शासनाने पीक कर्ज भरण्यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली.
जिल्हा बँकेमार्फत कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना ३१ जुलैपर्यंत कर्ज भरल्यास शून्य टक्के व्याजदर तर राष्ट्रीय किंवा व्यापारी बँकेमार्फत १ लाखाच्यावर कर्ज घेतल्यास त्यांनासुद्धा व्याजदरात सवलत मिळेल. ही शेवटची संधी म्हणून शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा.
- विनायक कहाळेकर, जिल्हा उपनिबंधक