अकोला : २५ डिसेंबरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन करून देशातील स्त्रियांना गुलामगिरीतून मुक्त केले. हे लक्षात घेऊन हा दिवस स्त्री मुक्ती दिन म्हणून घोषित करावा, अशी मागणी भारिप-बमसंच्यावतीने आयोजित स्त्रीमुक्ती दिन परिषदेत गुरुवारी अकोल्यात करण्यात आली. भारिप-बहुजन महासंघाच्या महिला आघाडीच्यावतीने गुरुवारी स्त्रीमुक्ती दिन कार्यक्रमाचे आयोजन रतनलाल प्लॉट येथील जि.प. अध्यक्षांच्या निवासस्थानाच्या प्रांगणात करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारिपच्या ज्येष्ठ नेत्या शोभा मुळे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून जि.प. अध्यक्ष शरद गवई, उपाध्यक्ष गुलाम हुसेन देशमुख, समाजकल्याण सभापती गोदावरी जाधव, महिला व बाल कल्याण सभापती द्रौपदाबाई वाहोकार, शिक्षण सभापती रामदास मालवे, भारिपचे महासचिव दिनकर वाघ, शेख साबीर, डॉ. प्रसेनजित गवई, अंजली तायडे, जि.प. सदस्य शोभा शेळके, मनपा सदस्य अरुंधती शिरसाट, धनश्री देव, प्रभा सिरसाट,लीला गावंडे, काजने आदींची उपस्थिती होती. परिषदेत ठरावाचे वाचन गोदावरी जाधव, द्रौपदाबाई वाहोकार, रेखा अंभोरे, पद्मा अमानकर, सुनीता तायडे, किरण बोराखडे, सुनीता गजघाटे, धनश्री देव, श्वेता पोहरे यांनी वाचन केले. प्रास्ताविक शोभा शेळके यांनी केले. संचालन सुवर्णा जाधव व आभार प्रदर्शन सुनीता गजघाटे यांनी केले. यावेळी भारिप-बमसंचे कार्यकर्ते व महिला पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या.
२५ डिसेंबर भारतीय स्त्री मुक्ती दिन घोषित करा
By admin | Updated: December 26, 2014 00:33 IST