अकोला: वाद-विवादामध्ये माणसाला मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागतो. पोलीस ठाणे, न्यायालयाच्या पायर्या चढाव्या लागतात. पैसाही खर्च होतो. त्यापेक्षा आपसी समझोता केव्हाही चांगला असतो. याचे महत्त्व पटवून देण्यासाठी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (दिल्ली) व महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण (मुंबई) यांच्या आदेशानुसार शनिवारी अकोला व वाशिम जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. लोकअदालतीच्या माध्यमातून ३0२८ प्रकरणे आपसी समझोत्यातून निकाली काढण्यात आली. अकोला व वाशिम जिल्ह्यातील सर्वच न्यायालयांमध्ये दाखलपूर्व प्रकरणे आणि न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांचा आपसी समझोत्याने निपटारा करण्यात आला. लोकअदालतीमध्ये एकूण ४0१ दाखलपूर्व प्रकरणे निकाली काढण्यात आली तसेच न्यायालयामध्ये प्रलंबित असलेल्या प्रकरणांपैकी ३0२८ प्रकरणांचा आपसी समझोत्यातून निपटारा करण्यात आला. यामध्ये ३ कोटी २४ लाख ५५ हजार ५३८ एवढय़ा रकमेची आपसी तडजोड लोकअदालतीच्या माध्यमातून करण्यात आली. या आयोजनासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.जी. देशपांडे यांचे मार्गदर्शन लाभले. पॅनेल सदस्य म्हणून काम करणारे विधिज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, प्राधिकरणाच्या कर्मचार्यांचे सहकार्य लाभले, असे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव पी.एम. बागडी यांनी कळविले.
भांडणापेक्षा समझोता बरा..!
By admin | Updated: December 16, 2015 02:08 IST