अकोला : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आजपर्यंत दुर्लक्षित असलेल्या जुजबी विकास कामांना भारतीय जनता पार्टीकडून पूर्णत्वास नेण्याचा खटाटोप केला जात आहे. संपूर्ण पाच वर्षांच्या कालावधीत ठोस विकास कामांना तिलांजली देणार्या राजकारण्यांनी अकोलेकरांच्या नजरेस पडतील,अशी कामे करण्याचा केविलवाणा प्रयत्न चालविला आहे. चाणाक्ष अकोलेकरांच्या नजरेतून ही बाब सुटली नसून, ही विकास कामे आताच कशी, असा सवाल उपस्थित केला जात आहे.निवडणुका जवळ आल्या म्हणजे इच्छुक उमेदवारांना अचानक कार्यकर्त्यांची आठवण येते. त्यांची आस्थेने विचारपूस करून काय हवे, काय नको, याची खातरजमा केली जाते. जी कामे जाणीवपूर्वक पाच वर्षांपासून लटकवून ठेवली जातात, त्या कामांना निवडणुकीच्या तोंडावर पूर्ण करण्याचा प्रघात जोपासल्या जातो. हा प्रकार चाणाक्ष नागरिकांच्या नजरेतून कधीही सुटला नाही; परंतु सर्वसामान्य नागरिकांना पाच वर्षांत हालअपेष्टा सहन कराव्या लागतात, याची जाणीव असूनसुद्धा त्याकडे दुर्लक्ष करण्यातच लोकप्रतिनिधींनी धन्यता मानली आहे. असाच काहीसा प्रकार शहरात भारतीय जनता पार्टीच्या संभाव्य उमेदवारांकडून होत आहे. प्रत्येक राजकीय पक्षाच्या लोकप्रतिनिधींना विकास कामांसाठी वर्षाकाठी २ कोटींचा निधी शासनाकडून प्राप्त होतो. भाजपातील लोकप्रतिनिधींच्या वाटेला आलेल्या या निधीतून ठोस व दर्जेदार विकास कामे मार्गी लागणे अपेक्षित असताना, कंत्राटदार बनलेल्या कार्यकर्त्यांना गब्बर करण्याच्या प्रयत्नात निकृष्ट रस्ते, नाल्या, समाजमंदिर बनविण्यात आले. अवघ्या पाच ते सहा महिन्यात सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांची अक्षरश: चाळणी झाल्याचे चित्र शहरात दिसून येते. विधानसभा निवडणूक लक्षात घेता, मागील सहा महिन्यांपासून अकोला पिम मतदारसंघात जुजबी विकास कामे पूर्ण करण्यावर इच्छुक उमेदवारांनी भर दिला आहे. यामध्ये अवघ्या आठ फूट रुंदीचे डांबरी रस्ते, नालीवरील धापा, नाल्या, बगिच्यांचे सौंदर्यीकरण आदींचा समावेश आहे. शिवाय गत चार वर्षांपासून सतत बंद पडलेली ट्रॅफिक सिग्नल यंत्रणा (अवघ्या तीन चौकातील) अचानक सुरू करण्याची इच्छा उफाळून वर आली आणि तडक निधी देत, भव्य सोहळादेखील घेण्यात आला. ही सर्व जुजबी विकास कामे अचानक सुरू झाल्याने सुज्ञ नागरिकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
निवडणुकीच्या तोंडावर भाजपला विकास कामांचा पुळका अकोलेकर म्हणतात, विकास कामे आताच कशी?
By admin | Updated: August 21, 2014 00:44 IST