वाशिम : विदर्भ व मराठवाड्यात पाऊस कमी पडल्यामुळे शेतकरी डबघाईस आला आहे. वाशिम जिल्हय़ातील केवळ वाशिम व रिसोड तालुक्यांचाच समावेश दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आला होता. मात्र, मी स्वत: जिल्ह्यातील परिस्थिती पाहिली असता उर्वरित चारही तालुक्यांचा दुष्काळग्रस्तांमध्ये समावेश करण्यासाठी येत्या मंगळवारी होणार्या कॅबिनेट बैठकीत निर्णय घेऊ, असे प्रतिपादन आज १६ ऑगस्ट रोजी वाशिम येथे पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार मेळाव्यात राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांताध्यक्ष सुनील तटकरे, पालकमंत्री मनोहर नाईक, आमदार ख्वाजा बेग, सुभाषराव ठाकरे, आमदार प्रकाश डहाके, आमदार संदीप बाजोरिया, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, बाबाराव खडसे, पांडुरंग ठाकरे, सोनाली ठाकूर, माधवराव अंभोरे, इमरान कुरेशी, सुनील पाटील, गजानन देशमुख, दिलीप जाधव आदींची उपस्थिती होती. निर्धार मेळाव्याच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी मंत्री सुभाषराव ठाकरे यांनी केले. यावेळी निर्धार मेळाव्याला मार्गदर्शन करताना उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप-सेनेवर तोफ डागत महाराष्ट्राला आघाडी सरकारच तारू शकते, असा विश्वास दिला. वाशिम जिल्ह्यामध्ये सिंचनाचा प्रश्न मोठा आहे. त्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने पैनगंगा नदीवर बंधारे बांधून शेतकर्यांसाठी सिंचनाच्या व्यवस्थेची वाटचाल सुरू आहे. सद्य: परिस्थितीमध्ये मराठवाडा व विदर्भात पाऊस अल्प असल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. मात्र, केंद्रामध्ये असलेल्या भाजप सरकारला याची थोडीही चिंता नाही. केंद्र सरकारने आतापर्यंंत एखादी टीम मराठवाडा व विदर्भाच्या दौर्यावर पाठविणे अपेक्षित होते. मात्र, त्यांना शेतकर्यांचे आता काही देणे-घेणे नाही. हे आहेत काय त्यांचे अच्छे दिन, असा टोलाही मारण्यास पवार चुकले नाहीत. आता काही महिन्यातच राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. यापुढे भाजपच्या खोटारड्या आश्वासनाला बळी न पडता आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा, असे आवाहन केले. यावेळी कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने कार्यकर्त्यांंची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन सिंधुताई तुपकर यांनी, तर आभार माजी जिल्हाध्यक्ष दिलीप जाधव यांनी केले.
वाशिम जिल्ह्यातील सर्व तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करणार
By admin | Updated: August 17, 2014 01:50 IST