लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महानगरपालिकेने मालमत्ता करवाढीचा घेतलेला निर्णय हा बेकायदेशीर आहे. त्यामुळेच भारिप-बमसंने सर्वात आधी करवाढीला विरोध करून आंदोलन उभारले. त्याचेच फलीत म्हणून आता मनपाने दहा टक्के करवाढ मागे घेतली आहे. खरे तर सर्वच करवाढ मागे घेण्याची गरज आहे, कारण मुळातच ती बेकायदेशीर आहे, त्यामुळे आता नागरिकांनी जुन्या कररचनेप्रमाणेच कर भरावा, असे आवाहन अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. करवाढीच्या विरोधात भारिप-बमसंने आंदोलनाची भूमिका घेतल्यानंतर आता आंबेडकरांनी हे नवे आंदोलन छेडले आहे. स्थानिक विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले की, प्रत्येक राज्यकर्ता हा जनतेचा सेवक आहे; मात्र सत्तेवर आल्यानंतर त्याला राजा झाल्यासारखे वाटत असेल, तर त्यांना जागे करण्याची व जागा दाखविण्याची गरज आहे. महानगरपालिकेतील सत्ताधारी सध्या याच मानसिकतेमध्ये आहेत. त्यामुळेच करवाढीचा बेकायदेशीर बोजा जनतेवर टाकला आहे. या करवाढीला विरोध करण्यासाठी आता मी माझ्या घराचा कर जुन्याच कररचनेनुसार भरणार आहे. नागरिकांनीही वाढीव कर भरू नये, असे आवाहन त्यांनी करून मनपाच्या विरोधात नवे रणशिंग फुंकले आहे. यावेळी माजी आमदार हरिदास भदे, काशीराम साबळे, विजय लव्हाळे, प्रसेनजित गवई आदी उपस्थित होते.
अकोलेकरांनो, जुनाच कर भरा! - आंबेडकर
By admin | Updated: June 15, 2017 01:30 IST