खामगाव (बुलडाणा) : आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकासाठी सुरू केलेल्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा २0१२ पासून ६ लाख ६८ हजार १८0 कुटुंबांनी लाभ घेतला आहे. दुर्धर आजारांवर उपचार करण्यासाठी या योजनेंतर्गत मदत केली जात असल्याने, ही योजना गरीबांसाठी संजीवनी ठरत आहे. शासनाने सन २0१२ पासून गरीबांसाठी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत शस्त्रक्रियासारखे महागडे उपचारसुध्दा मोफत केले जातात. या योजनेअंतर्गत लाभार्थी म्हणून पिवळे व केशरी, अंत्योदय, अन्नपूर्णा शिधापत्रिकाधारक पात्र ठरतात. सुरुवातीला ही योजना राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर राबविण्यात आली होती; मात्र या योजनेची उपयोगिता पाहता ही योजना आता संपूर्ण राज्यभर राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत आता गावागावात आरोग्य तपासणी शिबिर घेतले जात असून, यामध्ये आढळलेल्या दुर्धर आजाराच्या रुग्णांवर उपचार, तसेच गरज असलेल्या रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया केली जाते. प्रतिवर्ष प्रतिकुटुंब दीड लाखापर्यंतचे उपचार या योजनेअंतर्गत मोफत करण्यात येत आहेत. दरवर्षी या योजनेमध्ये सहभागी रुग्णालयांची संख्यासुध्दा वाढती असून, त्यामुळे ग्रामीण भागातील गरजूंना आता उपचार मिळणे सोपे झाले आहे.
६.६८ लाख कुटुंबांनी घेतला राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा लाभ
By admin | Updated: November 20, 2015 01:58 IST