राहुरी : डॉ.बाबुराव तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत मिळालेला विजय हा सभासदांनी घडविलेल्या परिवर्तनाचा असून, या परिवर्तनातूनच तनपुरे कारखान्याला गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी कटीबद्ध आहे, असा निर्धार विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी व्यक्त केला़ कारखाना कार्यस्थळावर आयोजित सभेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन विजयी संचालक आणि कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. आ. भाऊसाहेब कांबळे, जि. प. सदस्य सुभाष पाटील, डॉ. सुजय विखे, तान्हाजी धसाळ, सुरेशराव कर्पे आदी उपस्थित होते. विखे म्हणाले, हा कारखाना चालू करण्यासाठी ज्यांची एक रुपया आणण्याची दानत नव्हती, ते निवडणुकीत कोट्यवधी रुपयांच्या गोष्टी करीत होते. जी मुळा-प्रवरा संस्था बंद पडली, ती वाचविण्यासाठी हे कधी पुढे आले नाहीत. यांच्यावर लोकांचा विश्वास राहीला नाही. त्यामुळेच या निवडणुकीत सभासदांनी त्यांना धडा शिकविला. परिवर्तन घडवून एका चांगल्या कामाची सुरुवात सभासदांनी केली आहे. कामगारांनीही संयमीपणे या परिवर्तनात योगदान दिले. कार्यकर्त्यांनी १५ दिवस अहोरात्र मेहनत घेतली़ येणाऱ्या काळात हा कारखाना सुरु करण्याचा निर्धार करुन आपल्या सर्वांच्या सहकार्यानेच राहुरी तालुक्याचे वैभव पुन्हा मिळवू, असा आशावाद विखे यांनी व्यक्त केला.आता तुम्ही उसाची लागवड कराआता अधिक वेळ न दवडता संचालक मंडळ कारखान्याची सूत्रे हातात घेणार आहे. लवकरात लवकर हा कारखाना सुरु करण्यासाठी प्रयत्न करू. तालुक्याच्या पाणी प्रश्नांबाबतही योग्य भूमिका घेवून तो सोडविण्याचा आपण प्रयत्न करू़ उसाची लागवड चांगल्या पध्दतीने करा. उसाच्या गाळपाची जबाबदारी मी घेतो़ सभासदांना चांगला भाव देण्याची तयारी आहे, असे विखे कारखान्याचे अध्यक्ष डॉ़ सुजय विखे यांनी सांगितले़
‘तनपुरे’ला गतवैभव मिळवून देऊ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2016 23:38 IST