अहमदनगर : निम्मा जुलै महिना संपला, तरी समाधानकारक पाऊस नाही. मंगळवार अखेर जिल्ह्यात २४६ टँकरव्दारे पिण्याचा पाणी पुरवठा होत असून पाऊस लांबल्यास सप्टेंबर अखेर जिल्ह्यात ६०० पाण्याचे टँकर सुरू करण्याची वेळ येईल, अशी भिती जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने व्यक्त केली. कार्यकारी अभियंता शिवशंकर निकम यांची मालेगावला बदली झाली असून त्यांच्या जागेवर जालना जिल्हा परिषदेतून एस.एम. कदम बदलून आले आहेत. कदम यांनी मंगळवारी जिल्ह्यातील उपअभियंत्यांची बैठक बोलावली होती. त्यावेळी घेण्यात आलेल्या आढाव्यात ही माहिती पुढे आली आहे.जिल्ह्यात १ हजार ५५४ पैकी ३२८ स्वतंत्र पाणी योजना पाण्याअभावी बंद आहेत. मुळा आणि भंडारदरा धरणात पुरेशा प्रमाणात पाणी साठा नाही. यामुळे भविष्यात पाणी योजनाचे भवितव्य धोक्यात आहे. राज्य सरकारने राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमात सुरू असणाऱ्या पाणी योजनांचे काम तातडीने पुर्ण करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. याबाबत बैठकीत कदम यांनी आढावा घेतला. उपअभियंता आपद्कालीन आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)तालुकानिहाय सुरू असणाऱ्या टँकरची संख्या : संगमनेर ४६, अकोले १५, कोपरगाव ९, श्रीरामपूर ५, राहुरी २, नेवासा ४, राहाता १०, नगर ४१, पारनेर ४६, पाथर्डी ७९, शेवगाव २५, कर्जत ४०, जामखेड १८, श्रीगोंदा ६ यांचा समावेश आहे.
पाण्याचे टँकर वाढले
By admin | Updated: July 16, 2014 00:42 IST