कोपरगाव : लोकशाही बळकट करण्यासाठी मतदार महत्त्वाचा घटक असून नव मतदारांनी मतदार यादीत नाव असल्याची वेळोवेळी खात्री करावी. तसेच वेळोवेळी होणाऱ्या निवडणूक प्रक्रियेत पवित्र मतदानाचा हक्क जरूर बजावत राहावा, असे आवाहन तहसीलदार योगेश चंद्रे यांनी केले.
कोपरगाव तहसील कार्यालयात सोमवारी (दि. २५) निवडणूक शाखेच्या वतीने ११ व्या राष्ट्रीय मतदार दिवसाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने शहरातील श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जनजागृती फलक घेऊन सहभाग घेतला. तसेच तहसीलदार योगेश चंद्रे यांनी त्यांना शपथ दिली.
याप्रसंगी मुख्याध्यापक मकरंद कोऱ्हाळकर, दिलीप तुपसैंदर, रमेश गायकवाड, रघुनाथ लकारे, नीलेश बडजाते, अतुल कोताडे, बलभीम उल्हारे, दत्तात्रय वीरकर, अनिल काले, योगेश गवळी, राहुल चौधरी, श्रीकांत डांगे यांच्यासह शाळेचे विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. मतदार दिवसाचे सूत्रसंचालन समन्वयक सुशांत घोडके यांनी केले, तर निवडणूक शाखेचे अरुण रणनवरे यांनी आभार मानले.