लाेकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : महापालिकेने जाहीर केलेल्या ७५ टक्के शास्ती माफीची मुदत संपली असून, शेवटच्या दिवशी मंगळवारी २ कोटी ३७ लाखांचा कर वसूल झाला आहे. शहर प्रभाग कार्यालयात कर भरण्यासाठी रात्री उशिरापर्यंत रांगा लागल्या होत्या.
महापालिकेने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ७५ टक्के शास्ती माफ करण्याची घोषणा केली होती. ही मुदत सुरुवातीला ३० नोव्हेंबरपर्यंतची होती. शास्ती माफीला मुदतवाढ देण्याची नगरसेवकांची मागणी हाेती. या मागणीची दखल घेऊन महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली होती. ही मुदत १५ डिसेंबर रोजी संपली. शेवटच्या दिवशी मंगळवारी २ कोटी ३७ लाख रुपये वसूल झाले आहेत. शास्ती माफीमुळे ४७ कोटींची वसुली झाली आहे. पुढील पंधरा दिवस ५० टक्के शास्ती माफी दिली जाणार आहे. या सवलतीचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.