कोपरगाव : विलगीकरण नसल्यामुळे इतरांच्या संपर्कात येणाऱ्यांमुळे रूग्णसंख्येत झपाट्याने वाढत आहे. विलगीकरण कक्ष वाढविल्यास निश्चितच रूग्णसंख्येला आळा बसेल. याकरिता गाव तेथे विलगीकरण कक्ष सुरू करण्यात यावे, अशी मागणी जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी जिल्हाधिकारी डाॅ. राजेंद्र भोसले यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कोल्हे म्हणाले, सध्याच्या परिस्थितीत कोविड रूग्णांची संख्या वाढत आहे, दिवसेंदिवस वाढत असलेल्या रूग्णांची संख्या पाहता पुरेशा सोयीसुविधा नसल्याने रूग्ण व नातेवाईकांची हेळसांड होत आहे. तसेच विलगीकरण कक्षच नसल्याने रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोना बाधित असलेल्या रूग्णांच्या संपर्कात आलेल्या इतरांना संसर्ग होऊन रूग्णसंख्या वाढत आहे. त्याकरिता गाव तेथे विलगीकरण कक्ष सुरू केल्यास रूग्णसंख्या कमी होण्यास मदत होईल. गावपातळीवर अनेक डाॅक्टर्स प्रॅक्टिस करत आहेत, खेडोपाडी जाऊन वैद्यकीय सेवा देणाऱ्या डाॅक्टरांची मोठी संख्या आहे. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मदतीने रूग्णांना त्रास जाणवू लागल्यास त्यांचेवर गावपातळीवर प्राथमिक उपचार झाले तर रूग्ण संख्या आटोक्यात येईल.