नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी अर्थसंकल्पीय भाषणात ५० लाख रुपयांचा जनविमा उतरविणार असल्याचे सांगितले. त्याचे सर्वांनी स्वागत केले. उपनगराध्यक्ष करण ससाणे, श्रीनिवास बिहाणी, संजय फंड यांनी त्यात अडीच कोटी रुपयांची तरतूद करावी, अशी सूचना केली. शहरातील ५० टक्के लोकसंख्येला (५० हजार) त्याचा लाभ होईल, असे ते म्हणाले. नगरसेवक राजेंद्र पवार, राजेश अलघ, भारती कांबळे, दिलीप नागरे, शामलिंग शिंदे या सर्वांनी त्याला संमती दिली. मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून त्यासाठी परवागी घ्यावी लागेल असे स्पष्ट केले.
दरम्यान, सभेत पालिकेच्या कर थकबाकीचा विषय ऐरणीवर आला. करवसुली केवळ ३० टक्क्यांवर खाली आली आहे. चार हजार लोकांकडे १५ कोटींची थकबाकी झाली आहे. त्यामुळे पालिकेचे उत्पन्न घटले असल्याचे यावेळी झालेल्या चर्चेतून समोर आले.
नगरसेवक अंजूम शेख यांनी खासदार गोविंदराव आदिक नाट्यगृह खुले होऊ शकले नाही, अशी खंत व्यक्त केली. पालिकेच्या शाळांमध्ये अद्यापही शौचालयांची व्यवस्था करता आली नाही, तसेच वाल्मीकी योजनेतील घलकुलांची पडझड झाल्याचे शेख म्हणाले.
----------
पुतळ्यांसाठी ७५ लाखांची तरतूद
छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबडेकर तसेच इतर पुतळ्यांच्या उभारणीसाठी अर्थसंकल्पात ७५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली. मात्र, त्याकरिता परवानगी मिळविता आलेली नाही. त्यामुळे या प्रश्नावर केवळ राजकारण केले जाते का, असा आरोप अंजूम शेख यांनी केला.
----------
शास्ती माफीची मागणी
शहरातील मालमत्ताधारकांकडून २५ टक्के व्याजाने शास्ती अकारली जात आहे. त्यामुळे पालिकेचे उत्पन्न बुडाले आहे. नागरिकांच्या घरपट्टीत भरमसाट वाढ झाली असून, करदात्यांना ती परवडणारी नाही, अशी टीका नगरसेवक राजेश अलघ यांनी केली.
----------