अहमदनगर : येथील पर्यावरण संरक्षण व संवर्धन क्षेत्रात कार्य करणार्या ‘हरियाली’ संस्थेने शहरातील विविध १६ प्रजातींच्या वृक्षांच्या तीन लाख बियांचे संकलन केलेले आहे. या बियांचे सीना नदी काठावर दुतर्फा रोपण करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेच्यावतीने सचिन वाघले यांनी दिली. रोपण करण्यात येणार्या बियांत दुर्मीळ प्रजातीच्या वृक्षापैकी बहवा, रानभेंडी, रिठा, तामण, शिवण, वगटेसावर, पांगरा या सात प्रजाती, देशीवृक्षा पैकी भोकर, कडुलिंब, चिंच, करंज, वगशिद, सिसु या पाच प्रजाती तर परदेशी वृक्षांपैकी गुलमोहर, निलमोहर, सोनमोहर, रेन्ट्री या चार प्रजातींच्या तीन लाखाहून अधिक बिया संकलित करण्यात आलेले आहे. हवा, ध्वनी प्रदूषण नियंत्रण करणे, सुशोभिकरण, आॅक्सिजनची निर्मिती, सावली, पर्यावरण संवर्धनासाठी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीची आवश्यकता आहे. सीना नदी काठी दुतर्फा बीजारोपणासाठी संधी असल्याने, या परिसरात ग्रीन बेल्ट म्हणून विकसित करण्याचा उपक्रम या निमित्ताने राबविण्यात येणार आहे. उपक्रमाचा शुभारंभ जागतिक वृक्षरोपण दिन १ जूनपासून करण्यात येणार असल्याची माहिती हरियालीचे अध्यक्ष सुरेश खामकर यांनी दिली. उपक्रम राबविण्यासाठी बीज संकलित करण्यासाठी आर. एन. सुंबे, सतीश शिर्वे, संतोष पाटील, सचिन वाघुले, शरद पाटील आदींनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)
सीनाकाठी होणार बीजारोपण
By admin | Updated: May 26, 2014 00:24 IST