शिर्डी - साईबाबा आणि त्यांचे जीवन चरित्र अवघ्या जगाला सुपरिचित असले तरी शतकापूर्वी झालेल्या त्यांच्या महानिर्वाणाच्या नोंदीचा कोणताही कागद सरकार दप्तरी आढळत नाही. जीर्ण झालेले सरकारी दप्तर, त्यातील गहाळ झालेली पाने व कमालीच्या अनास्थेने हा दुर्मीळ व ऐतिहासिक ठेवा सध्या तरी अंधारातच आहे.१५ ऑक्टोबर १९१८ रोजी दुपारी अडीचच्या सुमारास बाबा पंचत्वात विलीन झाले. त्यानंतर हिंदू-मुस्लिमांच्या वादात तब्बल छत्तीस तासांनी सध्याच्या बुटीवाड्यात त्यांचा देह समाधिस्त करण्यात आला. यावेळी कोपरगावचे तहसीलदार व राहात्याचे फौजदार उपस्थित होते.. ब्रिटिश राजवटीतही प्रत्येक व्यक्तीच्या जन्म-मृत्युची नोंद घेतली जात असे. मृत्युच्या नोंदीत मृत्युचे कारणही नोंदवले जात. साईबाबा संस्थानची मुहूर्तमेढ रोवणार्या व साईभक्त असलेल्या राधाकृष्णा आई यांचा साईबाबांच्या निर्वाणापूर्वी २२ नोव्हेंबर १९१६ रोजी मृत्यू झाला. त्यांच्या मृत्युची नोंद राहाता तहसील कार्यालयाच्या रेकॉर्ड रूमला आहे. मात्र १९१८ सालच्या अत्यंत जीर्ण झालेल्या दप्तराची केवळ तीन निरूपयोगी पाने शिल्लक आहेत. अनेक कागदपत्रांचा अक्षरश: चुरा झाला आहे.शिर्डीचे प्रांताधिकारी कुंदन सोनवणे यांनी कोपरगाव तर राहात्याचे नायब तहसीलदार राहुल कोताडे यांनी राहाता तहसीलमध्ये या नोंदी शोधण्याकरिता 'लोकमत'ला केलेली मदत निष्फळ ठरली. बाबांच्या देहाचा पंचनामाही उपलब्ध नाही.६ नोव्हेंबर १९६0 रोजी अफरातफरीच्या प्रकरणातून संस्थान व्यवस्थापन बरखास्त करण्यात आले. तेव्हा कागदपत्रे नष्ट करण्याच्या प्रयत्नात अनेक महत्वाचे दस्तऐवजही नष्ट झाल्याचे बोलले जाते. साईबाबांच्या काळात शिर्डी कोपरगाव तालुक्यात होते.१९९७ मध्ये कोपरगावच्या विभाजनानंतर ते राहाता तालुक्यात आले. त्यानंतर बेवारस पडलेले शिर्डीचे दप्तर २0१२ मध्ये राहात्याला आणले गेले. जातीचे दाखल्यांकरता वारंवार झालेल्या हाताळणीने त्याचीही अवस्था बिकट झाली.
साई निर्वाण नोंदीचे दस्तऐवज सापडेना
By admin | Updated: October 22, 2015 21:16 IST