महात्मा गांधी रोजगार हमी योजनेद्वारे ग्रामीण भागात गरजूंना १०० दिवसाचा हक्काचा रोजगार दिला जातो. त्यानुसार मार्च अखेरपर्यंत जिल्ह्यात ३२७८ कामे सुरू होती. त्यावर १५ हजार ५४९ मजूर काम करत होते. यात ग्रामपंचायत विभागात २५१९ कामांवर १० हजार मजूर, तर यंत्रणेच्या ७५९ कामांवर ५ हजार ५३१ मजूर काम करत होते. यात घरकुलाची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. याशिवाय शोषखड्डे, रस्त्याची कामे, फळबागा कामे या कामांचा समावेश होता. परंतु एप्रिलपासून कोरोना रूग्णांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्यामुळे १५ एप्रिलपासून शासनाने कडक निर्बंध लावले. परिणामी रोहयो मजुरांची संख्याही घडली. यात बांधकाम साहित्याची दुकाने बंद असल्याने बांधकामांवर परिणाम झाला. परिणामी घरकुलांची कामेही थांबली.
चालू आठवड्यात कामांची संख्या, तसेच मजुरांची संख्या निम्म्याने कमी झाली आहे. चालू आठवड्यात १८२३ कामांवर ८ हजार २७३ मजूर काम करत आहेत. त्यात ग्रामपंचायतच्या १६०१ कामांवर ६ हजार १८८ मजूर, तर यंत्रणेच्या २२२ कामांवर २०२५ मजुरांचा समावेश आहे.
----------
आणखी मजूर घटण्याची शक्यता
सध्या असलेल्या ८ हजार मजूर संख्येतही पुढील काळात आणखी घट नोंदवली जाण्याची शक्यता आहे. कारण रूग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. ग्रामीण भागातही रूग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. शिवाय उन्हाचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे सध्याची रूग्णसंख्या आणखी कमी होऊ शकते.
-------
फोटो - रोहयो