श्रीगोंदा : विसापूर तलावात ४२४ एमसीएफटी (४८ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. तलावातून एक एप्रिलपासून शेतीसाठी आवर्तन सोडावे, अशी मागणी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी केली आहे.
फेब्रुवारीमध्ये विसापूरमधून आवर्तन सोडले होते. त्यामुळे बेलवंडी, पिंपळगाव, खरातवाडी, घारगाव, लोणी व्यंकनाथ, चिंभळे, शिरसगाव बोडखा, पिसोरे परिसरातील ५ हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांना जीवदान मिळाले आहे.
विसापूर तलावातील उपलब्ध पाणीसाठा विचारात घेऊन १ एप्रिलपासून २० दिवसाचे आवर्तन सोडणे आवश्यक आहे. त्यामुळे वरील गावांच्या शेतीबरोबर पिण्याचा पाणीप्रश्न सुटण्यास मदत होईल. विसापूर तलावात पाणी शिल्लक असूनही आवर्तन सोडण्यास विलंब झाला तर या परिसरातील पीक जळून जातील. त्यामुळे आमदार बबनराव पाचपुते व कार्यकारी अभियंता स्वप्नील काळे यांनी सर्व पाणी वापर संस्था प्रतिनिधींची बैठक घेऊन निर्णय घेणे गरजेचे आहे.
--
विसापूर तलावात सध्या एक आवर्तन पूर्ण होऊन पिण्याच्या पाण्यासाठी शिल्लक राहील एवढे पाणी शिल्लक आहे. त्यामुळे विसापूर तलावातून शेतीसाठी एप्रिलमध्ये आवर्तन सोडावे. अन्यथा शेतकरी रस्त्यावर येतील.
-अण्णासाहेब शेलार,
माजी उपाध्यक्ष, जिल्हा परिषद