अकोले : भंडारदरा व निळवंडे धरण पाणलोटात पावसाने उघडीप दिल्याने भंडारदरा जलाशयाच्या पाणीसाठ्यात घट दिसू लागली आहे. त्यामुळे विद्युत निर्मिती पाणी सोडणे बंद करण्यात आले आहे.धरण पाणलोटात पावसाने उघडीप दिली असून घाटघर, रतनवाडी, पांजरे, भंडारदरा, वाकी या पावसाच्या भागात बुधवारी पर्जन्यमानाचा आकडा निरंक होता. सध्या डोंगरदरीतून ओघळणारे चंदेरी प्रपात कड्याकपारीच्या कुशीत गुडूप झाले आहेत. २४ तासात केवळ १७ द.ल.घ.फू. नव्या पाण्याची आवक झाली. विद्युत निर्मितीसाठी ८१० क्युसेकने पाणी सोडले जात होते. त्यामुळे पाणीसाठा घटला असून बुधवारी सकाळी ६ वाजता वीज निर्मितीसाठी पाणी सोडणे बंद करण्यात आले आहे. आता निळवंडेत धरणातील पाण्याची आवकही घटली आहे. शेती आवर्तन सोडण्यात आले तर निळवंडे भरण्याची आशा धुसर झाली आहे. हरिश्चंद्रगड परिसरातही पावसाने उघडीप दिल्याने मुया नदीचा विसर्ग केवळ ५६१ क्युसेक होता. दरम्यान मंगळवारी कळस, गणोरे, अकोले शहर परिसरासह इंदोरी, मेहेन्दुरी भागात जोरदार पावसाने हजेरी लावली. दिवसभर उकाडा सहन करणाऱ्या अकोलेकरांना सायंकाळी जोरदार पावसांच्या सरींनी झोडपले. कळस व गणोरे भागात धुवॉंधार पाऊस बरसला, तर अकोले इंदोरी भागात जवळपास तासभर पावसाची रिमझिम सुरु होती. मंगळवारी अकोले ६, कोतूळ २०, निळवंडे ९,आढळा १ मिलीमिटर पावसाची नोंद झाली. गेल्या २४ तासांत निळवंडेत १११ तर आढळा धरणात ७ द.ल.घ.फू. पाण्याची आवक झाली. भंडारदरा- १० हजार ८०३, निळवंडे-५ हजार ९२४, तर आढळा -७२८ द.ल.घ.फू. पाणीसाठा झाला आहे. लाभक्षेञात शेतीसाठी आवर्तन सोडण्याची मागणी जोर धरत असून, दोन- तिन दिवसात आवर्तन सुटण्याची शक्यता आहे. या आवर्तनात किमान एक ते दीड टी.एम.सी. पाणी वापरले जाण्याची शक्यता असल्याने निळवंडे ‘ओव्हर फ्लो’ ची आशा धुसर झाली आहे. शेती आवर्तनाबाबत अद्याप आदेश मिळाले नसल्याचे जलसंपदाच्या वतीने सहाय्यक अभियंता किरण देशमुख यांनी सांगितले.
पाणलोटात पावसाची विश्रांती
By admin | Updated: August 21, 2014 22:56 IST