लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : शेतीमालाची मळणी सुरू झाल्यानंतर हमीभाव खरेदी केंद्र सुरू होतात. मात्र तूरीची मळणी सुरू होऊनही खरेदी केंद्र सुरू करण्याचा आदेश प्रशासनाला प्राप्त झालेला नाही. त्यामुळे तूर खरेदीत शेतकऱ्यांची मोठी लुट सुरू आहे. शासनाने तातडीने तूर खरेदी केंद्र सुरू करण्याचा आदेश महामंडळाला द्यावा, अशी मागणी तूर उत्पादक शेतकऱ्यांकडून होत आहे.
केद्र सरकारने तूरीला प्रति क्विंटल ६ हजार रुपये हमीभाव जाहीर केला आहे. चालूवर्षी वेळेवर पाऊस पडला. त्यामुळे तूरीची वेळेवर पेरणी झाली. सध्या तूरीची मळणी सुरू आहे. पिक काढणीला येण्यापूर्वीच खरेदी केंद्र सुरू होणे अपेक्षित होते. मात्र मळणी सुरू होऊन एक महिन्याहून अधिक कालावधी उलटून गेला. अतिवृष्टीमुळे बळीराजा अर्थिक अडचणीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचाही नाईलाज आहे. त्यामुळे शेतकरी तूर मिळेल त्या भावात व्यापाऱ्यांना विकत आहेत. बाजारात तुरीची आवक वाढल्याचे कारण देऊन माल खाली करून घेतला जात नाही. यंदा पोषक वातावरण असल्यामुळे तरीच्या उत्पादनातही वाढ झालेली आहे. तूरीतून मोठे उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. परंतू, खरेदी केंद्र सुरू नसल्याने शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला आहे. तूर खरेदी केंद्र सुरू नसल्याने शेतकऱ्याचा प्रति क्विंटल १००० ते १२०० रुपये तोटा होत आहे. जवळची तूर व्यापाऱ्यांना विकल्यानंतर शासनाचे खरेदी केंद्र सुरू होणार का असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
हमीभावाने शेतीमाल खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी करणे बंधनकारक आहे. ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर टप्प्या-टप्प्याने शेतकऱ्यांना माल घेऊ येण्याबाबत कळविले जाते. ही पध्दत वेळखाऊ आहे. त्यामुळे नोंदणी कधी होणार आणि आपला नंबर कधी लागणार, यामुळे शेतकरी तूर व्यापाऱ्यांकडे स्त:हून घेऊन जात असून, शासकीय खरेदीसाठी अद्याप नोेंदणी सुरू झालेली नाही. त्यामुळे तुर शासकीय तूर खरेदी सुरू होण्यास फेब्रुवारी महिना उजडेल, असे दिसते.
....
मुग व्यापाऱ्यांच्या घशात
जिल्ह्यातील ६८७ शेतकर्यांनी मुग विक्रीसाठी ऑनालईन नोंदणी केली होती. यापैकी २३४ शेतकऱ्यांनी मुग खरेदी केंद्रात आणून विकला. उर्वरित शेतकऱ्यांनी मुग व्यापाऱ्यांना विकला असून, वर्षभरात १ हजार १५५ क्विंटल मुगाचीच फक्त खरेदी झाली आहे.
...
११२ क्विंटल उडीदाचीच खरेदी
केंद्र शासनाने उडीदाला प्रति क्विंटल ६ हजार रुपये भाव जाहीर केला होता. जिल्ह्यातील ४७ शेतकर्यांनीच महामंडळाच्या पोर्टलवर नोंदणी केली होती. त्यापैकी १६ शेतकऱ्यांनीच फक्त मुग शासकीय खरेदी केंद्रात दिला. उर्वरित शेतकर्यांना उडीद व्यापाऱ्यांना विकला.
..
सोयाबीनची शासकीय खरेदी शून्य
केद्र शासनाने सोयाबीनला ३ हजार ८८० रुपये भाव जाहीर केला होता. जिल्ह्यातील १३१ शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली होती. परंतु, एकाही शेतकऱ्याने खरेदी केंद्रात सोयाबीन विकली नाही.
..
मका खरेदी जोरात
शासनाने मकाला १ हजार ८५० रुपये भाव जाहीर केला आहे. जिल्ह्यातील मका उत्पादक २ हजार ९२२ शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोेंदणी केली असून, अत्तापर्यंत ६२९ शेतकऱ्यांकडून मकाची खरेदी करण्यात आली आहे.
...