लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : शहरातील स्मार्ट एलईडी प्रकल्पासाठी प्राप्त झालेल्या निविदेबाबत तात्काळ कार्यवाही करा, अन्यथा आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा खुद्द उपमहापौर मालन ढोणे यांनी निवेदनाद्वारे मंगळवारी दिला.
उपमहापौर मालन ढोणे यांनी आयुक्त श्रीकांत मायकलवार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरातील पथदिव्यांची संख्या ३५ हजारांपर्यंत आहे. या दिव्यांची दुरुस्ती, मानधनावरील कर्मचारी, वीज बिल यासाठी वर्षाला १ कोटी ४० लाख रुपये खर्च येतो, तसेच दरमहा पालिकेला ४० लाख रुपये विज बिल भरावे लागते. महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट आहे. त्यामुळे बंद पडलेले दिवे बदलून मिळत नाहीत. नागरिकांकडून दिवे दुरुस्त करण्याची मागणी होते; परंतु विद्युत साहित्य मिळत नसल्याने नगरसेवकांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. विद्युत विभागाला पूणर्ववेळ अभियंता नाही, त्यामुळे विद्युत विभागातील कामे रखडली आहेत. महापालिकेने स्मार्ट एलईडी प्रकल्पासाठी निविदा मागविल्या आहेत. सदर निविदेचा तांत्रिक लिफाफा उघडण्यात आला असून, एक निविदा प्राप्त झाली आहे. शासनाच्या नवीन आदेशानुसार दुसऱ्यावेळी एक जरी निविदा प्राप्त झाली तरी त्यास मंजुरी देता येते. प्राप्त निविदेची छाननी करून पुढील कार्यवाही करावी, अन्यथा आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.
...
उमहापौरांचा घरचा अहेर
महापालिकेत राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर भाजपची सत्ता आहे. भाजपचे बाबासाहेब वाकळे हे महापौर, तर उपमहापौरपदाचा कारभार भाजपच्या मालन ढोणे यांच्याकडे आहे. सत्ताधारी पक्षाच्या उपमहापौर ढोणे यांनीच आंदोलनाचा इशारा देत एकप्रकारे घरचा अहेर दिल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे.