करंजी : पाथर्डी तालुक्यातील गर्भगिरी डोंगररांगांमध्ये दरवर्षी वनविभाग मार्फत लाखो झाडांचे रोपण करण्यात येते. मात्र त्याच्या संवर्धनाची व जंगलाची काळजी न घेतल्याने शासनाच्या लाखो रूपयांचे दरवर्षी नुकसान होत आहे.
पाथर्डी तालुक्यातील करंजीसह परिसरात गर्भगिरी डोंगरावर दरवर्षी हजारो वृक्षांची लागवड केली जाते. गेल्या १० वर्षांपासून या भागात ही वृक्ष लागवड केली जाते. फक्त शासनाच्या आदेशानुसार दरवर्षी लागवड करायची आणि त्याच्या संवर्धनाची जबाबदारी घ्यायचीच नाही, असा एककलमी कार्यक्रम वनविभाग राबवत आहे. त्यामुळे शासनाचे दरवर्षी लाखो रूपयांचे नुकसान होत आहे. यावर्षी उन्हाळ्यात गर्भगिरी डोंगरास दोन वेळा आग लागून शेकडो हेक्टर क्षेत्र त्यात जळून भस्मसात झाले. दोन वेळा लागलेल्या आगीत मोठ-मोठी वृक्ष जळून खाक झाली.
दरवर्षी करंजीसह परिसरातील दगडवाडी, वैजूबाभूळगाव, पवळवाडी, खंडोबावाडी, श्री क्षेत्र वृद्धेश्वरच्या डोंगरात वृक्ष लागवड केली जाते. किती वर्ष वनविभाग वृक्ष लागणार असल्याचा सवाल वृक्षप्रेमींतून विचारला जात आहे.
दरवर्षी लागवड करण्यापेक्षा आहेत त्या झाडांचे संगोपन तसेच आगीपासून संरक्षण करण्याची दक्षता घ्यावी, अशी मागणी या भागातील सागर कराळे, तुळशीदास शिंदे, महेश शिंदे, रामनाथ शिंदे, जालिंदर पवार, नवनाथ, उद्धव शिंदे, अनिल शिंदे, विशाल कराळे, योगेश शिंदे, उमेश शिंदे, देविदास शिंदेसह अनेक वृक्षप्रेमींनी केली आहे.
----
करंजीसह दगडवाडी, पवळवाडी, खंडोबावाडी, वैजूबाभळगाव परिसरात दरवर्षी वनविभागामार्फत वृक्ष लागवड केली जाते. मात्र त्याचे संवर्धन न केल्याने शासनाचा खर्च वाया जातो.
-सागर कराळे,
वृक्षमित्र, दगडवाडी