अहमदनगर : देहरे (ता. नगर) गावची मालोबा-बालोबा व मांगीरबाबा यात्रा धुलिवंदनच्या दिवशी कोरोनाबाबतच्या नियमांचे पालन करीत मोजक्याच लोकांत साजरी करण्यात आली होती. येथे भाविकांनी गर्दी केलेली नव्हती, अशी माहिती सरपंच बबन करंडे यांनी दिली.
देहरेतील यात्रेत हजारो भाविक जमले, अशा आशयाचे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर सरपंच बबन करंडे यांनी ‘लोकमत’कडे स्पष्टीकरण दिले. करंडे म्हणाले, गावच्या यात्रेत ऐनवेळी भाविकांची गर्दी होऊ नये यासाठी ठिकठिकाणी बॅरिकेट बसविले होते. मोजक्याच भाविकांनी कोरोनाबाबतच्या नियमांचे पालन करत सुरक्षित अंतर पाळून देवाचे दर्शन घेतले. त्यामुळे एकाच वेळी हजारो भाविक यात्रेत एकत्र आले नव्हते. यावेळी कोरोनाबाबतच्या कोणत्याही नियमांचे उल्लंघन झाले नाही. तसेच यात्रेपूर्वीही गावात कोरोनाचे रुग्ण होते. त्यामुळे यात्रेतील गर्दीमुळे कोरोनाचा शिरकाव झाला, असे म्हणणे योग्य होणार नाही, असे करंडे यांनी म्हटले आहे.