कृषिपंप वीजजोडणी धोरणानुसार लघुदाब वीजवाहिनीच्या खांबापासून ३० मीटरच्या आत असलेल्या कृषिपंपांना परिसरातील नजिकच्या रोहित्राची क्षमता पर्याप्त असल्यास नवीन वीजजोडणी देण्याची प्रक्रिया सुरु झाली आहेत. ज्या कृषिपंपांद्वारे अनधिकृत वीजवापर सुरु आहे त्यांनाही नवीन वीजजोडण्या देण्यात येत आहेत. ज्या ठिकाणी रोहित्रांची क्षमता पर्याप्त नाही त्या रोहित्रांची क्षमतावाढ करण्यात येणार आहे. लघुदाब वीजवाहिनीच्या खांबापासून ३० मीटरच्या आत अंतर असलेल्या अहमदनगर मंडळामध्ये १,७७४ वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत. तर इतर योजनेतून सुद्धा जिल्ह्यात कृषिपंपांच्या ९५० जोडण्या देण्यात आल्या आहेत.
राज्यात १ एप्रिल २०१८ नंतर प्राप्त झालेल्या अर्जानुसार कृषिपंपांच्या नवीन वीजजोडण्या देण्याची प्रक्रिया ठप्प झाली होती. त्यास पुन्हा गती देण्यासाठी राज्यात प्रथमच कृषिपंप वीजजोडणी व थकबाकीमध्ये सवलती संदर्भात स्वतंत्र धोरण तयार करण्याचे निर्देश दिले होते.
या अभियानानुसार लघुदाब वाहिनीपासून ३० मीटर व २०० मीटरच्या आत आणि रोहित्राची क्षमता पर्याप्त असलेल्या ठिकाणी उच्चदाब वाहिनीपासून ६०० मीटरपर्यंत उच्चदाब वितरण प्रणालीद्वारे एका रोहित्राद्वारे जास्तीत जास्त दोन कृषिपंपांना वीजजोडणी देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तसेच उच्चदाब वाहिनीपासून ६०० मीटरपेक्षा अधिक अंतरावरील कृषिपंपांना सौर ऊर्जेद्वारे नवीन वीजजोडणी देण्यात येणार आहे.
...............
७० कोटी ७ लाखांचा भरणा
ऑक्टोबर २०२० मध्ये जाहीर झालेल्या या योजनेत थकबाकी भरण्यासाठी विविध सवलती जाहीर झाल्यापासून अहमदनगर मंडळात १ लाख १० हजार ९३० शेतकऱ्यांनी थकबाकीपोटी ७० कोटी ७ लाख रुपयांचा याप्रमाणे भरणा करून या योजनेचा लाभ घेतला आहे. या योजनेचा लाभ मंडळातील सर्वच शेतकरी बंधूंनी घेण्याचे आवाहन नाशिक परिमंडळाचे अधीक्षक अभियंता संतोष सांगळे यांनी केले आहे.
..........
............