अहमदनगर: गत तीन वर्षापासून पिण्याच्या पाण्यासाठी सुरू असलेली बुरूडगावकरांची भटकंती आता थांबणार आहे. महासभेत बुरूडगावचा पाणी पुरवठा पूर्ववत करण्याचा निर्णय घेण्यात आला. मागील थकबाकी व आकारण्यात येणाऱ्या पाणी पट्टीविषयी गावकऱ्यांशी चर्चा करून तसेच शासनाचे मार्गदर्शन मागवून निर्णय घेण्यास सभेने मान्यता दिली. सप्टेंबर २०११ मध्ये महापालिका हद्दीतून बुरूडगाव वगळण्यात आल्यानंतर पालिकेने गावचा पाणी पुरवठा बंद केला. तेव्हापासून गावकऱ्यांची पाण्यासाठी भटकंती सुरू होती. गावकऱ्यांकडे १२ लाख रुपयांची थकबाकी असल्याने ती वसुली करण्याबरोबरच हद्दीत नसल्याने पाणी पुरवठा करण्याचा विषय महासभेसमोर होता. नगरसेवक गणेश भोसले, अनिल शिंदे यांनी पाणी पुरवठा पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली. कैलास गिरवले यांनी तर पाणी पुरवठा पूर्ववत करण्याबरोबरच मागील थकबाकी माफ करून यापुढील काळात बुरूडगावकरांना मोफत पाणी पुरवठा करावा अशी मागणी केली. शहरातील कचरा बुरूडगाव हद्दीत जमा केला जातो. त्याचा त्रास ते नागरिक सहन करतात. त्यामुळे मोफत पाणी दिले तर बिघडले कुठे असा सवाल त्यांनी केला. बाळासाहेब बोराटे यांनी फुकटात पाणी देण्यास विरोध दर्शविला. आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन छान-छान निर्णय घेऊ नये असे बोराटे म्हणाले. आगरकर यांनीही त्यास आक्षेप घेत शासनाचे मार्गदर्शन मागविण्याची सूचना केली. महापौर जगताप यांनी बुरूडगावचा पाणी पुरवठा पूर्ववत करण्यात येईल. गावकऱ्यांशी चर्चा करून मागील थकबाकी-पाणी पट्टी दर आकारणी, शासनाचेही मार्गदर्शन मागविण्याचा ठराव संमत केला.ा्रतिनिधी)
बुरूडगावला मिळणार महापालिकेचे पाणी!
By admin | Updated: September 3, 2014 23:58 IST