अहमदनगर: राज्यासमोर असलेल्या प्रश्नांवरून लक्ष हटविण्यासाठी महाविकास आघाडी सरकार अस्थिर असल्याचे नाटक करत असून, सत्तेसाठी लचार असलेले हे सरकार आहे, अशी घाणाघाती टीका भाजपाचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी सोमवारी नगर येथे पत्रकार परिषदेत केली.
विखे म्हणाले, राज्यात शेतकरी, कोरोनाची महामारी, असे एक ना अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. सर्वसामान्यांचे प्रश्न न सोडविता अंतर्गत मतभेद असल्याचे दाखवून जनतेची दिशाभूल केली जात आहे. जनतेच्या प्रश्नांसाठी ते तिन्ही पक्ष एकत्र आलेले नाहीत. जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक त्यांना करायची नाही. काहींना पैसे कमवायचे आहेत, ते पैसे कमविण्याच्या मागे लागलेले आहेत. काहीजण भांडत आहेत. सरकारमध्ये मतभेद आहेत. लाचारीसाठी हे पक्ष एकत्र आल्याने त्यांची एकी एवढ्या सहजासहजी तुटणार नाही, असाही टोला विखे यांनी लगावला.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना विखे म्हणाले, केंद्रीय मंत्रिमंडळात सहकाऱ्यांना संधी मिळालेली आहे. डॉ. प्रीतम मुंडे नाराज नाहीत. त्यांचे कार्यकर्ते नाराज झालेले आहेत. या नाराजीतून ते राजीनामे देत आहेत. परंतु, पंकजा मुंडे कार्यकर्त्यांची समजूत काढत आहेत, असे विखे म्हणाले.
...