मागील एक महिन्यापासून जामगाव शिवारात दोन बिबटे आपल्या पिलांसह वास्तव्यास आहेत. या दोन पिलांसह आठ दिवसांपूर्वी पुन्हा यातील एका मादीने दोन बछड्यांना जन्म दिला आहे. हे बिबटे सायंकाळी सात वाजताच शेतात येत असतात तर रात्री दहाच्या नंतर ते गावालगत असलेल्या शेतातही येत असतात. काही शेतकऱ्यांची आणि बिबट्यांची समोरासमोर भेटही झाली असल्याने शेतकऱ्यांमध्ये या बिबट्यांची दहशत निर्माण झाली आहे. आठवडावार या गावात वीज पंपांसाठी दिवसा आणि रात्रीच्या वेळी वीजपुरवठा असतो. अनेक शेतकऱ्यांनी उपसा सिंचन योजना राबविल्या असल्याने या गावात ऊसाचे तसेच भाजीपाला पिकाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. त्यामुळे या पिकांना रात्रीचा वीजपुरवठा असताना शेतात पाणी भरण्यासाठी एकटा शेतकरी बिबट्यांच्या मुक्त संचारामुळे घाबरू लागला आहे तर अनेक वेळा हे बिबटे गावठाणात तसेच वाडी वस्तीवरही येत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्यामुळे काही अघटित प्रकार घडण्यापूर्वीच वनविभागाने या बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी येथील ग्रामस्थांमधून होत आहे.
( ०२बिबट्या)