बाळासाहेब खेडकर , बोधेगावताजनापूर प्रकल्प पुरेशा निधीअभावी अनेक वर्ष रखडला आहे. प्रकल्पासाठी ८९ कोटी खर्चूनही कामे अर्धवट उभी आहेत. प्रकल्प कार्यान्वित होण्यासाठी सरकारकडे ७० कोटींची मागणी असताना अर्थसंकल्पात ३९५ कोटी खर्चाच्या प्रकल्पासाठी अवघे १० हजार रुपये मंजूर केल्याने राज्य सरकारची या प्रकल्पाबाबतची उदासीनता उघड झाली आहे.ताजनापूरच्या निधीचे भिजत घोंगडे कायम राहिले आहे. जिल्ह्यातील रखडलेले प्रकल्प मार्गी लागण्यासाठी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी नगर येथे आढावा बैठक घेतली. त्यामध्ये ताजनापूर कृती समितीच्या सदस्यांनी भेट घेऊन भरीव निधीची मागणी केली. महाजन यांनी ताजनापूरसाठी अर्थसंंकल्पात भरीव तरतूद करण्याचे ठोस आश्वासन दिल्याने लाभधारक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. पाटबंधारे विभागाने राज्य सरकारकडे ७० कोटींची मागणी केली. मात्र अर्थसंकल्पात अवघ्या १० हजारांचा निधी मंजूर केल्याने लाभधारकांच्या तोंडाला पाने पुसली गेली आहेत. त्यामुळे सरकारच्या दुटप्पी भूमिके सह सरकारची या प्रकल्पाविषयीची उदासीनता उघड झाल्याने धरणग्रस्त शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. ताजनापूर प्रकल्पाचे पाणी धरणग्रस्तांना मिळू नये, असा विडा सरकारने उचलला आहे का?, असा संतप्त प्रश्न विचारला जात आहे.
शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली
By admin | Updated: July 4, 2016 23:46 IST