अहमदनगर : नेवासा तालुक्यातील चांदा जिल्हा परिषद गटातील १३ गावातील एक हजार हेक्टरपेक्षा अधिक शेतीचे नुकसान झालेले आहे. शेकडो शेतकऱ्यांचे संसार रस्त्यावर आलेले आहे. कोट्यवधी रुपयांचे नुकसान झालेले असताना पालकमंत्री मधूकर पिचड, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि आमदार शंकरराव गडाख यांचे दुर्लक्ष झालेले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणाऱ्या आर्थिक मदतीची रक्कम तुटपंूजी असल्याने ती वाढविण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य संभाजी दहातोंडे यांनी केली आहे. गारपिटीच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दहातोंडे म्हणाले की, चांदा गटातील १३ गावात एक हजार हेक्टर शेतकऱ्यांचे १० कोटी रुपयांचे नुकसान झालेले आहे. यात सर्वाधिक फटका डाळींब आणि केळीच्या बागांना बसला आहे. लाखो रुपयांत होणाऱ्यांना नुकसानाला सरकारकडून तुटपूंजी भरपाई देण्यात येणार आहे. हा प्रकार शेतकऱ्यांची थट्टा करण्यासारखा आहे. पंचनाम्यावर कृषी अधिकारी, तलाठी आणि ग्रामसेवक यांच्या संयुक्त सह्या आवश्यक असून तिन्ही अधिकारी वेळेवर उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांची अडचण होत आहे. जिल्हाधिकाऱ्यांना महसूल यंत्रणेला गारपिटीचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश दिले आहेत. दोन दिवसांपूर्वी शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्या सोबत या गारपीटग्रस्त गावांची पाहणी केलेली आहे. या भागाला सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. दरम्यान, नेवाश्याचे आमदार गडाख यांना फक्त शिंगणापूर देवस्थान ट्रस्टचे देणे घेणे असल्याची टीका करत, घरचा आहेर दिला आहे.
गारपिटीकडे मंत्री, आमदारांचे दुर्लक्ष
By admin | Updated: June 10, 2014 00:12 IST