करंजी : पाथर्डी तालुक्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन कल्याण-निर्मळ महामार्गावरील महत्त्वाचा थांबा समजल्या जाणाऱ्या करंजी गावात शनिवार (दि. ३ एप्रिल) ते मंगळवार (दि. ६ एप्रिल) अशा चार दिवसांचा जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय ग्रामपंचायतीच्या बैठकीत घेण्यात आला.
ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य, ग्रामसेवक, तलाठी, व्यापारी हे हॉटेल व्यावसायिकांना या बंदच्या फिरून सूचना देत होते. महामार्गावरील करंजी हा महत्त्वाचा थांबा असल्याने व हॉटेल व्यवसाय येथे प्रमुख व्यवसाय असल्याने अनेक भागातील प्रवासी येथे थांबतात. यातूनच मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण येथे होत असून दिवसेंदिवस परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये, यासाठी शासनाच्या लॉकडाऊनच्या निर्णयाची वाट न पहाता, स्वतःच्या जिवासाठी, आरोग्यासाठी तरी आप-आपले व्यवसाय, हॉटेल्स चालकांनी बंद ठेवून सहकार्य करावे, असे आवाहन पदाधिकारी व कर्मचारी करीत आहेत. सकाळी सर्व हॉटेल व्यावसायिक, इतर व्यावसायिकांना विनंती करण्यासाठी सरपंच बाळासाहेब अकोलकर, ग्रा. पं. सदस्य रोहित अकोलकर, नवनाथ आरोळे, बाबा गाडेकर, ग्रामसेवक देशमुख, तलाठी माहिरे, पो. कॉ. सतीश खोमणे, गोरख साखरेसह अनेक जणांनी यात पुढाकार घेतला आहे.
--
गावातील परिस्थिती गंभीर होऊ नये. रुग्णांची संख्या वाढू नये. करंजी गावाचा परिणाम परिसरातील इतर ८-१० गावावर होऊ नये यासाठी स्वयंस्फूर्तीने बंदचा निर्णय घेतला आहे.
- बाळासाहेब अकोलकर,
सरपंच, करंजी
---
०१ करंजी
करंजी येथे सरपंच बाळासाहेब अकोलकर, ग्रा. पं. सदस्य, कर्मचारी, तलाठी, ग्रामसेवक व्यावसायिकांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करताना.