नगर तालुक्यातील टाकळी काझी येथे गेल्या वर्षभरापासून नाथपंथी डवरी-गोसावी समाजाचे सुमारे ५० कुटुंब वास्तव्याला आहेत. आपल्या बहुरूपी कलेद्वारे गावागावात भटकंती करून लोकांचे मनोरंजन करत उदरनिर्वाह करणे असा दिनक्रम या लोकांचा सुरू होता. मात्र, लॉकडाऊनमुळे सध्या लोकांची दारं यांच्यासाठी बंद झाल्याने त्यांची उपासमार होत आहे. याबाबत ‘लोकमत’ने थेट या समाजाच्या पालावर जाऊन त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या आणि त्याबाबत वृत्त प्रकाशित करून शासनाकडून, समाजाकडून मदत करण्याचे आवाहन केले होते. त्याची दखल घेत युवान सामाजिक संस्थेतर्फे टेक महिंद्रा कंपनीकडून शनिवारी (दि. १५) या लोकांना मदत करण्यात आली. युवान संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीप कुसळकर यांच्या मार्गदर्शनाखाली गोसावी वस्ती येथे सुमारे ५० कुटुंबीयांना १५ दिवस पुरेल इतक्या किराणा साहित्य आणि अन्न धान्याची मदत पोहोचविण्यात आली.
यावेळी युवान प्रतिनिधी हेमंत लोहगावकर, रूपेश पसपुल, टेक महिंद्रा कंपनीचे प्रतिनिधी संदीप पंडित, इम्रान अल्मेल, दीपक नाईक उपस्थित होते.
-----------
फोटो-१७गोसावी समाज
गोसावी समाज मदत
टाकळी काझी येथील ५० गरजू गोसावी समाजाच्या कुटुंबांना युवान सामाजिक संस्थेकडून पंधरा दिवस पुरेल, एवढा किराणा आणि अनुदानाचे वाटप करण्यात आले.