जामखेड : मोहा येथे रस्त्याच्या कामाची तक्रार का केली? निवडणुकीत विरोधात प्रचार का केला? अशा दोन कारणांवरून झालेल्या दोन गटांतील हाणामारीमध्ये पाचजण जखमी झाले. या प्रकरणी दोन्ही गटांकडून दाखल झालेल्या परस्परविरोधी तक्रारीवरून ३० जणांविरोधात जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. ग्रामपंचायत निवडणुकीच्या कारणातूनच हा वाद उद्भवला.
पहिली फिर्याद संदीप ज्ञानदेव डोंगरे यांनी दिली.
शुक्रवारी (दि. ५) रात्री साठेआठ वाजता शिवाजी त्रिंबक डोंगरे, वामन आत्माराम डोंगरे, प्रदीप आत्माराम डोंगरे, मारुती रघुनाथ डोंगरे, बाळू रघुनाथ डोंगरे, नवनाथ बाळू डोंगरे, रमेश मारुती डोंगरे, उमेश मारुती डोंगरे, बाबासाहेब वामन बांगर, केदार वामन बांगर, हर्षल बाळासाहेब डोंगरे, देविदास महादेव गर्जे, ज्ञानेश्वर महादेव गर्जे, मारुती गोविंद बेलेकर, वसंत दत्तात्रय झेंडे, छाया आत्माराम डोंगरे, स्वाती वामन डोंगरे, ऊर्मिला प्रदीप डोंगरे, मनीषा मारुती डोंगरे, महादेव प्रल्हाद गर्जे, मुक्ताबाई महादेव गर्जे (सर्व रा. मोहा) यांनी संदीप डोंगरे यांच्या घरासमोर गैरकायद्याने मंडळी जमविली. यावेळी ते सोमनाथ डोंगरे यांना म्हणाले, ‘तुम्ही आम्ही करीत असलेल्या रस्त्याच्या कामाविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज का केला?’ त्यानंतर सोमनाथ डोंगरे यांना लाकडी दांडक्याने व दगडाने मारहाण केली. तक्रार अर्ज मागे घेतला नाही तर तुमचा काटा काढतो असे म्हणत दमदाटी केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
दुसरी फिर्याद वामन आत्माराम डोंगरे यांनी दिली. संदीप ज्ञानदेव डोंगरे, सदाशिव ज्ञानदेव डोंगरे, ज्ञानदेव नामदेव डोंगरे (रा. मोहा), सोमनाथ श्रीधर डोंगरे, अशोक रामचंद्र दहिफळे, अभिनंदन सुरेश डोंगरे (रा. हापटवाडी), बाळू महादेव घुमरे (रा. रेडेवाडी), लहुराज देवीचंद डोंगरे, देवीचंद वामन डोंगरे (रा. हापटवाडी) यांनी वामन डोंगरे यांना घरासमोर येऊन मारहाण केली. ग्रामपंचायत निवडणुकीत देवीचंद वामन डोंगरे यांच्याविरोधात काम का केले असे म्हणत मारहाण केली. काहीजण सोडविण्यासाठी आले असता त्यांनाही मारहाण करण्यात आली, असे फिर्यादीत म्हटले आहे.