कोपरगाव : कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेऊन केंद्र सरकारने शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे़ सरकारचा पहिलाच निर्णय चुकीचा झाला आहे़ यावरून जनतेने शितावरून भाताची परीक्षा करावी, असे आवाहन करतानाच माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी मोदी सरकारवर टीका केली़ कर्मवीर शंकरराव काळे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण व स्मृती उद्यानाच्या उद्घाटनासाठी पवार कोपरगाव येथे आले होते़ कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला़ ते म्हणाले, कांदा उत्पादक शेतकरी हा जिरायती भागातला असतो़ त्याच्या उत्पादनाला कधीतरीच चांगला भाव मिळतो़ परंतु केंद्रातील सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेऊन एक प्रकारे शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे़ नवे केंद्र सरकार स्थापून आता दोनच महिने झालेले आहेत़ जनतेने त्यांना बहुमताने निवडून दिले आहे. यापुढे त्यांनी ग्राहक व उत्पादकांच्या हिताचे निर्णय घ्यावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली़ (प्रतिनिधी) पाणीप्रश्नावर पवारांनी बोलणे टाळलेगोदावरी कालवे, नाशिक, नगरचा पाण्याचा प्रश्न यावेळी आ़ अशोक काळे व माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांनी उपस्थित करून, हा भाग उजाड होण्यापासून वाचविण्यासाठी पाणीप्रश्नी पवारांनी लक्ष घालावे, अशी मागणी केली होती़ त्यावर पवार यांनी बोलण्याचे टाळले़पाण्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार आता आम्हाला राहिलेला नाही़ लोकांनीच नव्या सरकारला तो अधिकार दिला आहे, असे ते म्हणाले़
शितावरून भाताची परीक्षा करा
By admin | Updated: July 20, 2014 00:23 IST