तीसगाव : पाथर्डी तालुक्यातील देवराई गावाजवळील बंधाऱ्यात अंघोळीसाठी गेलेल्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाला. एक जण बचावला. ही घटना गुरुवारी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास घडली. ते तीसगाव येथे जिलेबी विक्री करत होते.
प्रणव पांडुरंग कुचेकर (वय १७, रा. बीड), मनेष देवराबी बिष्णोई (रा. जोधपूर, राजस्थान), अशी बंधाऱ्यात बुडून मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. लादुराम जगन्नाथ पालेवाल (रा. जोधपूर, राजस्थान), असे बचावेल्या तरुणाचे नाव आहे.
प्रणव कुचेकर, मनेष बिष्णोई, लादूराव पालेवाल हे तिघे तरुण गुरुवारी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास देवराई येथील बंधाऱ्यात अंघोळ करण्यासाठी गेले होते. बंधाऱ्यातील पाण्याचा अंदाज न आल्यामुळे यापैकी प्रणव व मनेश या दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. लादुराम मात्र सुदैवाने बचावला. त्याने महामार्गावर उभे राहून आरडाओरड करून इतरांना मदत मागितली. आजूबाजूच्या लोकांनी तात्काळ घटनास्थळी येऊन रुणांना वाचविण्याचा प्रयत्न करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. पोलीस निरीक्षक दिलीप राठोड, सहायक फौजदार रवींद्र चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल ईश्वर बेरड यांनी घटनास्थळी येऊन या दोन तरुणाचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाथर्डीला रवाना केले. तरुणांचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी युवा नेते अनिल पालवे, रामदास माळी, गणेश कारखेले, पांडुरंग कारखेले यांनी सहकार्य केले.