पाथर्डी : तालुक्यातील यंदाच्या पोळा सणावर अतिवृष्टीमुळे मोठे संकट आले आहे. अचानक आलेल्या पुरात अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर पशुधन मृत्युमुखी पडले आहे.
तालुक्यातील बहुतांश भाग कायम दुष्काळाच्या छायेत असतो. परंतु, यंदा मात्र जूनपासून लांबणीवर पडलेला पाऊस ऑगस्टअखेर मोठ्या प्रमाणावर बरसला. रात्रीच्या काळोखात आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांचे पशुधन मोठ्या प्रमाणावर मृत्युमुखी पडले. तालुक्यात आजअखेर अतिवृष्टीमुळे गाय-५, बैल ३, म्हशी ४, वासरू १, शेळ्या ९० असे एकूण १०३ शेतकऱ्यांचे पशुधन मृत झाल्याची सरकारदप्तरी नोंद आहे. याशिवाय हजारो कोंबड्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्या.
समाधानकारक पाऊस झाल्यामुळे नदी-नाले खळाळून वाहत असले, तरीही पोळा सणाच्या तोंडावर शेतकऱ्यांचे शेतीकामात मदत करणारे बैल, गाय तसेच इतर पशुधन संकटात सापडल्याने पोळा सणावर दुःखाचे सावट आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये सण साजरा करण्यावर निरुत्साह आहे.
-----
गायी, म्हशी गेल्या वाहून...
कोरडगाव येथील नानी नदीला ३१ ऑगस्टला पहाटे आलेल्या पुरामध्ये सुभाष देशमुख या शेतकऱ्याच्या गायी, म्हशी, बैल असे पशुधन वाहून गेले. घरात साठविलेले धान्य, संसारोपयोगी वस्तू वाहून गेल्याने क्षणात होत्याचे नव्हते झाले. त्यांचा संपूर्ण उदरनिर्वाह शेती, शेतीपूरक व्यवसायावर अवलंबून असून पशुधनाच्या माध्यमातून त्यांचा उदरनिर्वाह चालतो. परंतु, पशुधन नाहीसे झाल्याने त्यांच्या कुटुंबांवर शोककळा पसरली. यामुळे पोळा सण साजरा करणार नसल्याचे देशमुख यांनी सांगितले. प्रशासनाकडून झालेल्या नुकसानीची योग्य भरपाई मिळाल्यास शेतीकामासाठी नवीन बैलजोडी विकत घेऊन पुन्हा जोमाने शेती करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
----
अतिवृष्टीमुळे पुरात वाहून गेलेल्या संपूर्ण जनावरांचे शवविच्छेदन केले आहे. योग्य तो अहवाल शासनाकडे पाठविला आहे.
डॉ. जगदीश पालवे,
पशुवैद्यकीय अधिकारी
----
०५ पाथर्डी नुकसान
कोरडगाव येथील शेतकरी सुभाष देशमुख यांचा पुरामुळे रिकामा झालेला गोठा.