प्रशासनाने लागू केलेली कडक नियमावली तसेच पतसंस्था कर्मचाऱ्यांचे कोरोनापासून संरक्षण व्हावे, यासाठी जिल्ह्यातील पतसंस्थांच्या दैनंदिन कामकाजात बदल करण्यात आला आहे. पतसंस्थांची अर्थसेवा ही अत्यावश्यक सेवा सदरात येत असल्यामुळे नियमांचे पालन करत पतसंस्था चालू ठेवण्यात येत आहेत. त्यानुसार नगर जिल्ह्यातील पतसंस्थांच्या कामकाजात बदल करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व पतसंस्थांनी बदललेल्या वेळेनुसारच आपल्या कार्यालयाचे काम करावे. कामकाजाच्या वेळेतील बदल ३१ मे पर्यंत लागू असेल. त्यानंतर त्यावेळच्या परिस्थितीनुसार निर्णय घेऊन कळविण्यात येईल. सर्व संस्थांच्या कामकाजात सुसूत्रता असावी यासाठी जिल्ह्यातील सर्व सहकारी पतसंस्थांनी या नियमांचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन सबाजीराव गायकवाड व रवींद्र बोरावके यांनी केले आहे.
पतसंस्थांच्या कर्मचाऱ्यांना ओळखपत्र देण्यात यावे, कर्मचाऱ्यांच्या गरजेनुसार संख्येचे नियमन करावे, सर्व पतसंस्था कर्मचाऱ्यांनी कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी, शक्य असेल त्या सेवा जास्तीत जास्त डिजिटल माध्यमांचा वापर करुन कराव्यात, संस्थेत व प्रवेशद्वारात सॅनिटायझरची व्यवस्था करावी, सोशल डिस्टन्सिंग नियमांचे पालन करावे अशा सूचना फेडरेशनच्या वतीने देण्यात आल्या आहेत. पतसंस्थांच्या दैनंदिन कामकाजात केलेल्या बदलाची माहिती जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीने जिल्हाधिकारी, जिल्हा उपनिबंधक, जिल्हा पोलीस अधीक्षक व सर्व तालुका सहाय्यक निबंधक यांना देण्यात आली आहे.