घारगाव : विद्युत वाहक तार अंगावर पडून एका गाईचा मृत्यू झाल्याची घटना संगमनेर तालुक्यातील नांदूर खंदरमाळ (बावपठार) येथे शुक्रवारी सायंकाळी घडली.
एकनाथ बाबुराव करंजेकर हे नांदूर खंदरमाळ (बावपठार) येथे राहत असून, शेतीबरोबरच ते पशुपालनाचा व्यवसाय करतात. या शेतकऱ्याची एक गाय त्यांच्या मालकीच्या शेतात चरत असताना, अचानक महावितरणची विद्युत वाहक तार तिच्या अंगावर पडली. विजेच्या धक्क्याने या गाईचा जागीच मृत्यू झाला. दुभत्या गायीचा मृत्यू झाल्याने, एकनाथ करंजेकर या शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. महावितरण कंपनीने तुटलेल्या विजेच्या तारा त्वरित जोडाव्यात आणि पंचनामा करून मदत मिळवून द्यावी, अशी मागणी करंजेकर यांनी केली आहे.