अहमदनगर : जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदलीची प्रक्रिया सोमवारपासून सुरू होत आहे. यंदा ऐन कर्मचाऱ्यांच्या बदलीच्या काळात मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांची बदली झाली असून त्यांच्या जागेवर रवींद्र बिनवडे आले आहेत. नवखे मुख्य कार्यकारी अधिकारी बिनवडे यांच्यासमोर कर्मचाऱ्यांच्या बदल्या पारदर्शकपणे करण्याचे आव्हान आहे. गेल्या काही वर्षांपासून नगर जिल्हा परिषदेने पुढाकार घेत कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यासाठी आॅनलाईन पद्धतीचा वापर केला. यंदा तर प्रशासनाने पुढाकार घेत बदल्यांचे अर्जच आॅनलाईन केले आहेत. यामुळे बदल्या सुरळीत होतील, अशी कर्मचाऱ्यांची अपेक्षा होती. सामान्य प्रशासन विभागाने तीन दिवसांपूर्वी बदलीपात्र कर्मचाऱ्यांची सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध केली होती. मात्र, हे करत असताना संभाव्य रिक्त असणाऱ्या पदांचा तपशील टाकण्यात आला नव्हता. शनिवारी दुपारी सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव यांनी तातडीने सर्व विभागांतील कर्मचाऱ्यांची बैठक घेवून रिक्त पदांचा तपशील घेतला. त्यानंतर तो सायंकाळी संकेतस्थळावर टाकण्यात आला असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाने दिली. काही विभागांकडून दरवेळी बदल्यांच्या वेळी ३१ मे सेवानिवृत्तीनंतर जागांचा तपशील लपवण्यात येतो. त्यानंतर वर्षभरात यथावकाश या जागा भरण्यात येतात. य्ांदा असा प्रकार होऊ नये, अशी अपेक्षा कर्मचाऱ्यांतून होत आहे. नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी बिनवडे यांनी यात स्वत: लक्ष घालण्याची मागणी होत आहे. (प्रतिनिधी)
सीईओंसमोर पारदर्शक बदल्या करण्याचे आव्हान
By admin | Updated: May 8, 2016 00:54 IST