अहमदनगर : तापमानाच्या पार्याने चाळिशी ओलांडली आहे. गेल्या दोन दिवसांपासून नगरचे तापमान ४१ ते ४२ अंशावर पोहोचले आहे. वातावरणामध्ये प्रचंड उकाडा असल्याने नगरकर हैराण झाले आहेत. पंखे, कुलर, एसी अशा उपाययोजनांवरही मर्यादा आल्या आहेत. रात्रं-दिवस अंगातून अक्षरक्ष: घामाच्या धारा ओघळत आहेत. उकाड्यामुळे नगरचे मुंबई झाले आहे. कडाक्याचे उन्हामुळे दुपारच्यावेळी रस्त्यांवर अघोषित संचारबंदी लागू झाली आहे. वैशाख महिना हा सर्वात कडक उन्हाचा महिना असल्याची झलक सध्या नगरकरांना येत आहे. बुधवारी आमावस्या असल्याने वैशाख महिनाही संपला असून रोहिणी नक्षत्र लागल्याने पावसाचे वेध लागले आहेत. अशा स्थितीत उन्हाचा कडाका वाढला आहे. तापमानाचा पारा ४० अंशावर गेला आहे. गेल्या दोन दिवसांतील तापमानाचा पारा ४१, ४१.९ आणि ४२ अंशावर गेले आहे. त्यामुळे कडाक्याच्या उन्हाचा तडाखा बसत आहे. रस्त्यावरील रहदारीही कमी झाली आहे. दुपारी बारा ते सायंकाळी पाचपर्यंत रस्त्यांवर शुकशुकाट होत आहे. दुपारी दुचाकीवर जाणारे उन्हाचा बंदोबस्त करूनच बाहेर पडत आहेत. डोळ््याला गॉगल, कानाला आणि डोक्याला रुमाल, डोक्यावर टोप्या घालूनच नगरकर बाहेर पडत आहेत. महिला छत्रीचाही आधार घेत आहेत. विक्रेते दुपारच्या वेळी गायब झाले होते. त्यामुळे रस्ते निर्मनुष्य झाले होते. बाहेर कडाक्याचे उन आणि घरामध्ये प्रचंड उकाडा असल्याने नगरकर त्रस्त झाले आहेत. उकाड्यामुळे अक्षरश: अंगातून घामाच्या धारा वाहत आहेत. कुलर्स, पंखे, एसी लावले तरी उकाडा कमी होताना दिसत नाही. घराच्या खिडक्या उघड्या ठेवल्या तरी वारा बंद असल्याचे त्याचा काहीच उपयोग होत नाही. अनेक जण घराच्या गच्चीवर, घरासमोर झोपत आहेत. वसाहतींमध्ये रात्रीचे जागरणही वाढले आहे. उकाड्यामुळे घराच्या बाहेर येऊन अनेकजण रात्री काढत आहेत. रात्रीचा उकाडा वाढल्यामुळे अनेकांच्या झोपाही गायब झाल्या आहेत.
चाळिशीत पारा... घामाच्या धारा
By admin | Updated: May 28, 2014 00:14 IST